केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ; महाराष्ट्राच्या वाट्याला एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री.

संगमनेर Live
0
खा. नारायण राणे, खा. कपील पाटील, डॉ. भागवत कराड व डॉ. भारती पवार यानी घेतली मंत्रीपदाची शपथ.

संगमनेर Live (नवी दिल्ली) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल व विस्तार झाला, यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकूण ४३ मंत्र्यांना शपथ दिली. यात महाराष्ट्रातील एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा एकूण चार मंत्र्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार समारंभात आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी घटकपक्षांच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यपदाची शपथ घेतली. यामध्ये १५ कॅबिनेट मंत्री आणि २८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यावेळी उपराष्ट्रपती एम. व्यंकैया नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीयमंत्री व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्र्यांची शपथ..

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल व विस्तारात आज महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्री पदाची तर खासदार सर्वश्री कपील पाटील, डॉ. भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना राज्यमंत्री म्हणून पद व गोपनियतेची शपथ दिली.

माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नारायण राणे, भिवंडी लोकसभा मतदार संघाचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार कपील पाटील, दिंडोरी लोकसभा मतदार संघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या खासदार डॉ. भारती पवार आणि नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेले खासदार डॉ. भागवत कराड पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून कार्यभार पाहणार आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !