निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील वारकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना
◻️ आमदार खताळ यांनी पारेगाव बु।। येथे बैठक घेवून तयारीचा घेतला आढावा
संगमनेर LIVE | संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहाणी आमदार अमोल खताळ यांनी केली. या पालखीतील वारकरी बंधूआणि भगिनींची कोणतीही अडचण होणार नाही याची सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी आणि त्याबाबतचे सुयोग्य नियोजन करावे अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या.
आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरला जाताना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बु।। येथे मुक्कामाला थांबते. गेली अनेक वर्षाची ही परंपरा असून तालुक्यातील भाविकांच्या वतीने या पालखीचे मनोभावे स्वागत करण्यात येत असते. मागील वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. त्यामुळे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत निवृतीनाथ महाराजांच्या पालखी मार्ग कामाबाबत जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागांच्या अधिकार्यांना गांभिर्याने नियोजन करून पालखी येण्यापुर्वीच सर्व व्यवस्था निर्माण करण्या बाबतच्या सूचना दिल्या होत्या.
आमदार अमोल खताळ यांनी पारेगाव बु।। येथे येवून ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेवून तयारीचा आढावा घेतला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तीन वाॅटरफ्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे महायुती सरकारने मंडपासाठी पाच लाख रूपये, २ लाख ग्रामपंचायती करीता अनुदान तसेच २५० शौचालय आणि स्नानगृहा करीता २००युनिट उभारणीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
आरोग्य सेवेबाबत तात्पुरत्या स्वरुपातील दवाखाने सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवावेत. पिण्याचे पाणी, तसेच वीज पुवरठा सुरळीत राहील याची दक्षता घेण्याबाबत आ. खताळ यांनी सांगितले. मंडप उभारण्यात येणाऱ्या जागांची तसेच पालखी मार्गावर झालेल्या कामाची माहीती आ. खताळ यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता शाम मिसाळ यांच्या कडून जाणून घेतली. या रस्त्याच्या कामाकरीता मंत्री विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्गाचे काम होवू शकले. उरलेल्या दिवसात साईडपट्ट्यांची काम पूर्ण करण्याच्या सूचना आ. खताळ यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
संगमनेर तालुक्यात संत निवृतीनाथ महाराज देवस्थानची पालखी संगमनेर तालुक्यात येणे हा अहील्यानगर जिल्ह्यासाठी मोठा अभिमान आहे. त्यामुळे या पालखीचे स्वागत चांगल्या पध्दतीने व्हावे म्हणून यंदा ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून चांगले नियोजन झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली असून जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी वारकरी सांप्रदयातील कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन आ.अमोल खताळ यांनी केले आहे.