आदिवासींसाठी हक्काचे घर आणि शिक्षणासाठी प्राधान्य देणार - डॉ. विखे पाटील
◻️ रहीमपूर येथे जागतिक आदीवासी दिन उत्साहात साजरा
संगमनेर LIVE | विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशातील आदिवासी बांधव विकासच्या मुख्य प्रवाहात येत आहे. आदिवासी समाजाच्या उज्वल भविष्याकरीता हक्काचे घर शिक्षण आणि रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत. अशी ग्वाही युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे भव्य मिरवणूक व आदिवासी एकात्मता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. भगवान वीर एकलव्य, बिरसा मुंडा आणि इतर महामानवांच्या प्रतिमांना वंदन करून आदिवासी साम्राज्य ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो आदिवासी बांधव, माता-भगिनी आणि युवक-युवतींच्या उत्साही सहभागामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “आदिवासी समाज हा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. परंतु अनेक दशके हा समाज विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिला. अजूनही २६ गावांतील आदिवासी बांधव अतिक्रमणात व असुरक्षित ठिकाणी राहतात. पुढील एक वर्षात प्रत्येक गावात शिबिरे घेऊन त्यांना हक्काचे घरकुल, दर्जेदार शिक्षण आणि सरकारी योजना मिळवून देण्यासाठी मी स्वतः कटिबद्ध असल्याचे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आपल्या युवकांनी शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करावी, हा माझा संकल्प आहे. पुढील पंचवीस वर्षात अहिल्यानगर जिल्ह्याचा कलेक्टर एखादा आदिवासी युवक होईल, यासाठी आपण सर्वानी मिळून प्रयत्न करायचे आहेत. गरीब जनतेचा आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे, आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरच आपण आदिवासी समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करू आशी ग्वाही दिली.
कार्यक्रमा दरम्यान डॉ. विखे पाटील यांनी आदिवासी युवकांना थेट आवाहन केले “तुम्ही माझ्याकडे नोकरीसाठी अर्ज करा, मी माझ्या घरातूनच सुरुवात करून तुम्हाला रोजगार देण्याचा प्रयत्न करीन. आपल्या समाजातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही, याची जबाबदारी मी वैयक्तिकरित्या घेतो.”
आमदार अमोल खताळ म्हणाले, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणले. आदिवासी बांधवांना सन्मान देण्याचे कार्य विखे परिवार करत असताना, आपले महायुती सरकारही आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी साम्राज्य ग्रुपच्या सर्व पदाधिकारी आणि तरुणांनी प्रयत्न केल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. असे कौतुक डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी केले.