राज्यात महायुतीच्या विकासाला विजयाचां कौल - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेरच्या विकासाची धुरा अधिक सक्षमपणे सांभाळण्याची दिली ग्वाही
संगमनेर LIVE | संपूर्ण राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस महायुतीने दणदणीत यश संपादन केले असून, या विजयावर आमदार अमोल खताळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा विजय म्हणजे निव्वळ राजकीय विजय नसून राज्याच्या जनतेचा महायुतीवरील अढळ विश्वास आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या राजकारणाला मिळालेली ही एक मोठी पावती आहे, असे त्यांनी नमूद केले.
राज्यातील या विजयाचे विश्लेषण करताना आमदार खताळ म्हणाले की, महायुती सरकारने गेल्या काही काळापासून राज्यात विकासाची जी घडी बसवली आहे, त्याचेच प्रतिबिंब या निकालात उमटले आहे. विशेषतः पायाभूत सुविधांची निर्मिती, नागरिकाभिमुख लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी, शहरी भागांचा सुनियोजित विकास आणि प्रशासनातील वाढलेली पारदर्शकता या गोष्टींमुळेच जनतेने महायुतीच्या झेंड्याला पसंती दिली आहे. हा विजय म्हणजे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अहोरात्र मेहनतीला आणि सामान्यांच्या अपेक्षांना मिळालेला एक सकारात्मक प्रतिसाद आहे.
दरम्यान, संगमनेरच्या स्थानिक राजकारणाविषयी बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात महायुतीची लाट असताना दुर्दैवाने संगमनेरकरांनी मात्र नगरपालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्याला डावलले. असे असले तरी, आम्ही लोकशाहीच्या या निकालाचा पूर्ण आदर करतो. निकाल आमच्या विरोधात असला, तरी संगमनेर शहराच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. आगामी काळात हे शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यासाठी महायुतीचे प्रयत्न यापुढेही अविरत सुरूच राहतील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेवटी, महानगरपालिकांमधून मिळालेला हा कौल राज्याच्या प्रगतीला अधिक गती देण्याची जबाबदारी वाढवणारा असून, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आम्ही विकासाचे राजकारण पुढे नेणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.