◻️ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले लोकार्पण
◻️ शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर होणार
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर दरम्यानचा म्हाळुंगी नदीवरील पूल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जनतेसाठी खुला करण्यात आला. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते रविवारी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने विद्यार्थ्याना आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
चार वर्षापूर्वी हा पूल कोसळला होता. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या पुलाचे काम करावे यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली. यानंतर या पुलाच्या कामास सुरुवात झाली होती. या पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी सौ. नीलम खताळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ म्हणाले की, पूर्वी या पुलाचे बांधकाम स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून झाले होते. काही वर्षांपूर्वी एका ठेकेदाराच्या हल गर्जीपणामुळे हा पूल कोसळला होता. त्यानंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन महसूल मंत्री आणि विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. यामुळे दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, या पुलाच्या नव्या कामास मंजुरी मिळाली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या नव्या पुलाचे लोकार्पणही झाले. हा एक सकारात्मक योगायोग ठरला असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले.
म्हाळुंगी नदीचा पूल पडला असल्याने अनेक वर्षापासून विद्यार्थ्याना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. आमदार खताळ यांनी दोन वेळा या पुलाची पाहणी करून ठेकेदारांना दर्जेदार कामासाठी सूचना दिल्या होत्या. अल्पावधीत हे बांधकाम पूर्ण करून नागरिकांसाठी पूल खुला करण्यात आला.
संगमनेर शहरातील साईनगर पंपिंग स्टेशन घोडेकर मळा भागातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने याभागात विकासाची कामे आणखी गतीने होणार आहेत. नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. असे देखील यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले.