नवीन लोकप्रतिनिधीकडून राजकारणासाठी ४० कोटींची मंजूर रस्त्यांची कामे रद्द?
◻️ सभापती शंकर खेमनर यांच्या दाव्यानंतर तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर बनवला. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. या तालुक्यातील विविध ८ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४० कोटी रुपयांचा निधी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून घेतला होता. मात्र नवीन लोकप्रतिनिधीने आठ महिन्यात एक रुपयाचा निधी न आणता राजकारणासाठी मंजूर रस्त्यांची कामे रद्द करून दुर्दैवी राजकारण केल्याचा गंभीर आरोप सभापती शंकर खेमनर यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी १३ मार्च २०२४ रोजी ग्रामविकास विभागाकडे संगमनेर तालुक्यातील विविध ८ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश होऊन या रस्त्यांचे कॉन्टिटीकरण करावे, याकरता मागणी केली होती. यानुसार शासन पत्र ४ ऑक्टोबर २०२४ नुसार टप्पा दोन (बॅच १) च्या निर्णयानुसार ४० कोटी ७३ लाख ८१ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
यामध्ये डिग्रस ते रणखांबवाडी २.५० कि.मी. साठी ३ कोटी ५३ लाख ९७ हजार, चिखली ते जवळे कडलग ४.६० कि.मी. साठी ६ कोटी ३१ लाख ८९ हजार, खरशिंदे ते खांबे रस्ता दोन कि.मी. साठी २ कोटी ४५ लाख ९६ हजार रुपये, मिर्जापुर ते धांदरफळ खुर्द रस्ता ४.२६ कि.मी.साठी ५ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये, पारेगाव खुर्द ते तिगाव वडझरी रस्ता ५.३० कि.मी. साठी ६ कोटी १ लाख ४२ हजार रुपये, साकुर ते बिरेवाडी रस्ता ३.८५० कि.मी. साठी ४ कोटी ८१ लाख ५७ हजार रुपये, शिंदोडी ते ठाकरवाडी रस्ता तीन किलोमीटर करता ४ कोटी १६ लाख ३ हजार रुपये, तासकरवाडी ते खंडेराया वाडी रस्ता ५.३१० किलोमीटरसाठी ७ कोटी ७६ लाख ३१ हजार रुपये या कामांचा समावेश होता. एकूण ३०.५७० किलोमीटर लांबीसाठी ४० कोटी ७३ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र ७ ऑगस्ट २०२५ च्या नव्या अध्यादेशानुसार ही सर्व कामे रद्द करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.
मागील आठ महिन्यांमध्ये नवीन सरकार मधून एक रुपयाचा निधी न आणता जुन्याच निधीवर उद्घाटनाचे कार्यक्रम करणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधीने आपल्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळण्यासाठी हे सर्व कामे रद्द करून आणली आहेत. जेणेकरून ही जुनीच कामे पुन्हा नव्याने टेंडर करता येतील आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता येईल, असा हा डाव आहे. याचबरोबर मागील आठ महिन्यांपासून संगमनेर शहर व तालुक्यामध्ये वातावरण खराब करण्याचे काम सुरू झाल्याचा आरोप केला.
ही कामे रद्द झाल्यामुळे डिग्रस, रणखांबवाडी, साकुर पठार, चिखली, जवळे कडलग, खरशिंदे, खांबा, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द, पारेगाव खुर्द, तिगाव, साकुर, बिरवाडी, शिंदोडी, ठाकरवाडी, तासकरवाडी, खंडेरायवाडी या गावांमधील नागरिकानी संताप व्यक्त केला आहे.
रस्त्याचा निधी रद्द करणे दुर्दैवी..
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी धांदरफळ खुर्द गावाकर्ता आणि तालुक्यातील इतर ७ रस्त्यांसाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र फक्त राजकारण करावे आणि आपल्या मर्जीतील ठेकेदारांना काम देता यावे याकरता नवीन लोकप्रतिनिधीने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून रद्द केलेल्या कामाचा प्रकार निंदनीय केल्याची टीका माजी सभापती सौ. निशाताई कोकणे यांनी केली.