शाखेच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवा - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर शहरात शिवसेना शाखेचा शुभारंभ
संगमनेर LIVE | शिवसेना पक्षात कार्यकर्ता या पदाला महत्त्व आहे. या पक्षात कोणी नोकर व चालत नाही. मी या तालुक्याचा आमदार असलो तरी, सर्वप्रथम कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्ता म्हणूनच काम करायचे आहे. शिवसेना शाखेच्या माध्यमातून कार्यकर्त्यानी सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवावे. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर शहरातील कुंभार गल्ली येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसेना शाखेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले, मला तुम्ही आठ महिन्यापूर्वी निवडून दिले, तेव्हा पासून आपण सर्वाचीच कामे करत असून एक एक माणूस जोडत आहे. महायुती परिवारामध्ये येणाऱ्यांचे आपण स्वागत करतो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जसे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत होते तसेच, राजकारण आपण सुद्धा करत आहोत.
शिवसेना पक्षात नुसते पदे घेऊन मिरवायचे काम करू नका. गोर - गरीब, कष्टकरी, वंचित जनतेच्या हिताची विकास कामे करा. लाला दायमा सारखा तरुण त्यांच्याकडे होता. परंतु, त्यांनी त्याच्यासाठी काही केले नाही. म्हणून त्याने तीन महिन्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तुम्ही सर्व तरुण कार्यकर्त्यानी एकत्रित येत शिवसेनेची शाखा सुरू केली आहे. या शाखेच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी या शाखेत आपल्या समस्या व प्रश्न मांडावे. तुमचे प्रश्न येथे सुटले नाही तर माझे जनसंपर्क कार्यालय आहेचं. असा विश्वास दिला.
विरोधकांनी सर्व सामान्य कार्यकर्त्याचा विकास न करता त्यांच्या बगलबच्चांचा विकास केला. आपल्याला सर्वसामान्यांचा विकास करायचा आहे. पुढील काळात आपल्याला सर्वाना शिवसेना पक्षाचे काम वाढवायचे आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर कोणत्याही परिस्थिती मध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचाच आहे. यासाठी सर्वानी कामाला लागावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर किंवा ईव्हीएम मशीनवर झाल्या तरी, कुठलाही फरक पडणार नाही. असे म्हणत विरोधकांना या निवडणुकीत सुद्धा जनता घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असे ठणकावले.