संगमनेरकरांना दिलासा! शिवनेरी व विनावाहक बस आता थेट आगारात थांबणार
◻️ आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला परिवहनमंत्र्याचा ‘ग्रीन सिग्नल'
संगमनेर LIVE (नागपूर) | पुणे आणि नाशिकहून संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांची अनेक वर्षांपासून सुरू असलेली पायपीट आता थांबणार आहे. संगमनेर आगारात ‘शिवनेरी’ आणि विनावाहक बसगाड्यांना थांबा देण्याबाबत राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांनी तातडीने संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा निर्णय मार्गी लागला आहे.
संगमनेरमधील नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी पुणे आणि नाशिक या मोठ्या शहरांमध्ये दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, ‘शिवनेरी’ (Shivneri) आणि विनावाहक बसगाड्या शहरात न येता थेट बाह्यवळण मार्गाने पुढे जात होत्या. त्यामुळे संगमनेरला येणाऱ्या प्रवाशांना शहराबाहेर उतरून मोठा प्रवास पायी किंवा अन्य वाहनाने करावा लागत होता, ज्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय होत होती.
प्रवाशांच्या या गंभीर समस्येबाबत आमदार अमोल खताळ यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी निवेदन देऊन या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधले.
आमदार खताळ यांच्या मागणीची परिवहनमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आणि प्रवासी वर्गाचे होणारे हाल लक्षात घेऊन तत्काळ निर्णय घेतला. त्यांनी ‘शिवनेरी’ आणि विनावाहक बसला संगमनेर आगारात थांबा देण्याबाबतच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
दरम्यान या तातडीच्या निर्णयामुळे पुणे-नाशिक मार्गावरून प्रवास करणाऱ्या संगमनेरच्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार असून, त्यांना शहराच्या मध्यभागी असलेल्या आगारातच उतरता येणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे विशेष आभार मानले आहेत.