केवळ पदवी नको, कृषि शिक्षणातून बळीराजाला समृद्ध करा - डॉ. सुस्मिता विखे
◻️ लोणी येथे ‘कृषि नोव्हा २०२६’ मध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव
संगमनेर LIVE (लोणी) | कृषिच्या विद्यार्थ्यानी केवळ पदवी मिळवण्यासाठी शिक्षण न घेता, आपल्या ज्ञानाचा उपयोग शेती व्यवसायाला आधुनिक चालना देण्यासाठी करावा. नवनवीन तंत्रज्ञान थेट शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवून त्यांना समृध्द करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा प्रवरेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी व्यक्त केली.
लोणी येथील प्रवरा कृषि शास्त्र संस्थेच्या वतीने आयोजित ‘कृषी नोव्हा २०२६’ या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, संचालक डॉ. उत्तमराव कदम, प्राचार्या स्वरांजली गाढे, प्राचार्य अमोल खटके, प्राचार्य डॉ. संतोष वर्पे, प्राचार्य डॉ. बाळ जाधव, विद्यार्थी परिषदेचे अश्विनी काळकुटे, गायत्री मखरे, तन्मय शिंपी, समृद्धी गुजर यांच्यासह पालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्याशी संवाद साधताना डॉ. सुस्मिता विखे यांनी कृषि शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे महत्त्वही अधोरेखित केले. प्रवरा कृषि शास्त्र संस्थेच्या माध्यमातून एकाच छताखाली मिळणाऱ्या या शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये अवगत करावीत आणि आपला शेती व्यवसाय अधिक प्रगत करावा, असे त्यांनी सुचवले.
केवळ पदवी घेण्यापेक्षा आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या शेतकरी बांधवांना कसा होईल, यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विशेषतः महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचारांचा निषेध करण्यासोबतच, समाजात महिलांचा सन्मान राखण्याचे संस्कार मुलांवर होणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “मुलगी शिकली म्हणजे प्रगती झाली असे नाही, तर जेव्हा मुली आणि महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल, तेव्हाच समाजाची प्रगती झाली असे म्हणता येईल,” असे विचार त्यांनी यावेळी मांडले.
संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून कृषि शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा शेतकऱ्यांसाठी ‘कृषि सल्लागार'श’ बनावा, यावर संस्थेचा विशेष भर असल्याचे त्यांनी सांगितले.
‘लॅब टू लॅड’ हे तंत्रज्ञान विकसित करतानाच, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देऊन त्यांचा शेती व्यवसाय अधिक किफायतशीर कसा होईल, यासाठी संस्था नेहमीच आघाडीवर राहिली आहे. प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे ज्ञान दिले जात असून, आज अनेक विद्यार्थी शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी तन्मय शिंपी, मनिषा झाल्टे आणि प्रथमेश बोराटे यांनी केले, तर शेवटी डॉ. रमेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.