◻ भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विश्वास.
संगमनेर Live | आव्हानात्मक परिस्थितीत अंगणवाडी सेविका माता बाल संगोपनाचे करीत असलेले काम हे सामाजिक दायित्वाचे असुन, अंगणवाडीतील मुलांना पोष्टीक बिस्कीट देण्याचा सुरु केलेला उपक्रम राज्याला प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राहाता पंचायत समिती आणि जनसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात कमी वयातील बालकांना पोष्टीक बिस्कीट देण्याचा उपक्रम राज्यात प्रथमच सुरु करण्यात आला. राहाता तालुक्यासह राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील अंगणवाडीमधील बालकांना प्रातिनिधीक स्वरुपात या पोष्टीक बिस्कीटांचे वितरण आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सभापती सौ. नंदाताई तांबे, उपसभापती ओमेश जपे, माजी उपसभापती सुभाषराव विखे, संतोष ब्राम्हणे, सौ. सुवर्णा तेलोरे, गोरक्षनाथ तांबे, गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे, गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, शिक्षण विस्तार आधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, प्रकल्प आधिकारी सौ. नागरे आदि याप्रसंगी उपस्थित होते. माझी कन्या भाग्यश्री या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ठेव पावतीचे वितरणही करण्यात आले.
आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले की, तालुक्यात विकासाची प्रक्रीया सुरु असते. वैयक्तिक लाभाच्या योजनांची अंमलबजावणी होणे हे तीतकेच महत्वाचे आहे. तालुक्यात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आधिकाऱ्यांमध्ये असलेल्या चांगल्या सुसंवादामुळेच योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होते. यामुळेच पंचायत समितीचा राज्यस्तरावर गौरव होतो ही अभिमानाची बाब आहे. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून माता बाल संगोपनाचे होत असलेले चांगले काम हे राज्याला प्रेरणा देणारे आहे. कारण कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात आलेले यश हे अंगणवाडी सेविकांच्या जिद्दीने केलेल्या कामाचे यश असल्याचे सांगितले.
करोनाच्या भितीमुळे जेव्हा जबाबदार माणसे घरात बसली तेव्हा अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत अंगणवाडी सेविका सामाजिक दायित्व निभावून काम करीत होत्या. उद्याच्या पिढीचे आरोग्य चांगले राखण्यासाठीच त्यांनी जोपासलेला सेवाभाव हा महत्वाचा ठरला. स्मार्ट अंगणवाडी बरोबरच सुदृढ बालकांच्या आरोग्यासाठी होत चांगल्या कामामुळे सामाजिक स्वास्थ चांगले राखण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करतानाचा तालुक्यातील किशोरवयीन मुलीच्या आरोग्याची तपासणी करण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्याची सुचना त्यांनी पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि आधिकाऱ्यांना केली.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, सकस आणि चांगला आहार ग्रामीण भागातील मुलांना यासाठी नाबार्डचे माजी चेअरमन डॉ. वाय. एस. पी थोरात यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा दिली. ब्रिटानीया कंपनी आणि जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून या बिस्कीटांचे उत्पादन करण्यात आले. रोज २ बिस्कीटे असे ३६ दिवस बालकांना द्यायचे आहेत. यातून बालकांच्या प्रतिकार शक्तीचे, वाढलेल्या वजनाचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या प्रास्ताविकात गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले की, तालुक्यात ३१८ अंगणवाड्या असून, एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत करण्यात आलेल्या सव्हेक्षणात तिव्र व मध्यम वजनाची आढळून आलेल्या बालकांसाठी हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण विस्तार आधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी केले.