◻ वनविभागाने स्थानिकाच्या मदतीने बिबट्याला सुखरूप काढले बाहेर.
संगमनेर Live (बाबासाहेब वाघचौरे) | राहुरी तालुक्यातील सात्रळ व सोनगाव परिसरात बिबट्या मागील अनेक दिवसापासून धुमाकूळ घालत असून बिबट्या परिसरातील कुत्री, शेळ्या, लहान कालवडी यांच्यावर हल्ले करत असल्यामुळे शेतकऱ्याना मोठे अर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास सात्रळ येथिल कैलास जगन्नाथ प्रधान याच्या गट नं. २७० मध्ये असलेल्या विहिरी लगत असलेल्या तारेच्या कुंपणातून बिबट्याने शिकारीच्या शोधात आतमध्ये प्रवेश केला होता. यावेळी अंधारात बिबट्या शेळीसह थेट दावे तुटल्यामुळे विहिरीत पडला. यावेळी बिबट्याने विहिरीतील पाईपचा आधार घेतला. तर शेळीला आपला जीव गमवावा लागला आहे.
सकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रधान कुटुंबाला डरकाळी फोडण्याचा आवाज ऐकू आल्याने त्यानी विहरीकडे धाव घेतली असता त्याना विहिरीत बिबट्या व मृत शेळी दिसली. तात्काळ याबाबत त्यानी वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल व कर्मचाऱ्यानी घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्याची मोठी गर्दी झाली होती. यावेळी वनविभागाचे अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सचिन गायकवाड, वनरक्षक चव्हाण, लक्ष्मण किनकर, शंकर खेमनर, हारदे, घनदाट, जाधव, पठाण, तारचंद गायकवाड, शिंदे आदिसह स्थानिकाच्या मदतीने बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. यावेळी वनविभागाने पंचनामा केला आहे.
याप्रसंगी पद्मश्री डाॅ. विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू पाटील, नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष व शिवसेना उप तालुका प्रमुख जयेश वाघचौरे, विलास प्रधान, अलताब इनामदार, शाहरुख सय्यद, अहमद इनामदार, अन्सार शेख, टिलु साबळे, रमेश पलघडमल, संपत शिंदे आदि उपस्थित होते. यावेळी या परिसरात आणखी बिबट्ये असण्याची शक्यता नागरीकानी वर्तवून पिजंरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.