विद्यार्थ्यांनी नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक व्हावे!

संगमनेर Live
0
विद्यार्थ्यांनी नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक व्हावे!

◻️ सौ. शालिनीताई विखे यांचे ‘पायरेन्स’च्या विद्यार्थी-पालक मेळाव्यात आवाहन 

संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा कुटुंबाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्याधारित शिक्षणाची संधी मिळत आहे. या शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता समाजाची बांधिलकी जपण्यासाठी करा. आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करतानाच प्रवरा संस्थेचे नावही मोठे करा आणि मोठी स्वप्ने पाहून जीवनात पुढे जा, असा संदेश जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी दिला.

'पायरेन्स' संस्थेच्या एमबीए, एमसीए आणि बी.व्होक. अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील, संस्थेचे सचिव डॉ. निलेश बनकर, आयबीएमचे संचालक प्रा. मोहसीन तांबोळी, एमसीएच्या समन्वयिका प्रा. ऋतुजा कोतकर, प्रा. सौरभ विखे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाता यावे, या उद्देशाने शिक्षण संस्थांची उभारणी केली. या संस्थांच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले प्रवरेचे अनेक विद्यार्थी आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत.

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही शिक्षणाची स्पर्धा वाढली असून, प्रवरेची शैक्षणिक गुणवत्ता उच्च पातळीवर पोहोचली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. पालकांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता शिक्षणाचे हे कार्य पुढे नेले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे उद्योजक व्हावे, या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थी घडविताना शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवून आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे, उच्च पातळीवर पोहोचावे आणि मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे पाटील यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच जीवन घडविणारे कौशल्य देण्यावर संस्थेचा भर असल्याचे सांगितले. पालकांनी वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्यावा. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करताना आपण कोणत्या उद्देशाने या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे आणि भविष्यात काय साध्य करायचे आहे, याची दिशा निश्चित करावी; त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन सातत्याने उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ पदवी मिळवून देणे हा संस्थेचा उद्देश नसून, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आयुष्य सक्षमपणे उभे राहावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे, असे सांगताना पालक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी आयबीएमचे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी यांनी संस्थेच्या विविध शैक्षणिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती दिली. पालकांच्या वतीने एस. बी. डुक्रे आणि कविता तोडमल यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा पुलाटे, सृष्टी चौधरी आणि पायल राहणे यांनी केले, तर आभार प्रा. ऋतुजा कोतकर यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !