बाबासाहेबांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचा निर्धार करा - जीवन भालेराव
◻️मालुंजेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी पाहिलेली स्वप्ने आणि त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे, हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते जीवन भालेराव यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित दोन दिवसीय महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर भव्य विद्युत रोषणाई आणि निळ्या ध्वजांच्या सुशोभिकरण करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सागर खरात यांनी ‘दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेच्या स्थापनेमागचा बाबासाहेबांचा उद्देश स्पष्ट केला. ग्राम शाखांच्या माध्यमातून हा उद्देश तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आशा खरात यांनी ग्राम शाखेच्या आतापर्यतच्या कार्याचा आढावा घेत आगामी योजनांची माहिती दिली.
उध्दघाटक डॉ. किरण घुगे यांनी आपल्या बारामती येथील शासकीय सेवेतील अनुभवांतून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव कसा पडला, हे विशद केले आणि मालुंजे येथील तरुणांच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अनिल मुन्तोडे यांनी आपल्या भाषणात जीवन पवित्र राखण्याचा आणि जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवण्याचे आवाहन केले.
याआधी सकाळी मालुंजे परिसरातून पांढऱ्या शुभ्र वस्त्रांमधील स्त्री-पुरुषांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या तालावर शिस्तबध्द पद्धतीने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. सुरेश खरात आणि किरण घुगे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी आदर्श, सर्वेश आणि उत्कर्ष खरात या बालवक्त्यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली. तर श्रेया मुन्तोडे हिने सादर केलेल्या ‘माझा भीम मले भेटतो बाई’ या शाहिरीने कार्यक्रमात रंगत भरली.
समता सैनिक दलाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रतीक्षा खरात, सोनाली खरात आणि श्वेता खरात यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बर्डे आणि दिलीप खरात यांनी केले, तर आभार संतोष खरात यांनी मानले.
दरम्यान, या महोत्सवासाठी उषा निळे आणि राजेंद्र खरात यांच्या परिवारातर्फे ‘भोजन दान’ करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक खरात, संजय खरात, गणेश खरात, प्रकाश खरात, अमोल खरात, वर्षा खरात आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी परिसरातील नागरिक, महिला आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.