संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी शिवारातील पाण्याने भरलेल्या बंधाऱ्याला तडे गेल्यामुळे हा बंधारा कोणत्याही क्षणी फुटल्यास जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आश्वी बुद्रुक येथील आठ कुटुंबांना महसूल प्रशासनाने तातडीने आश्वी बुद्रुक शाळेत हालविले आहे.
पाणी टंचाई ने नेहमीच त्रस्त असलेल्या निमगावजाळी सह आश्वी परिसरातील गावांनमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने कित्येक वर्षे बंद असलेले ओढे नाले वाहते झाल्यामुळे कोरडे ठाक पडलेले बंधारे ही भरले आहेत.
निमगावजाळी शिवारातील दत्त मंदिरालगत बंधाऱ्याला तडे गेल्यामुळे त्यातून पाणी मोठ्या प्रमाणावर आश्वी शिवारातील तुडुंब भरलेल्या माती बंधाऱ्याकडे येत आहे. हे दोन्ही बंधारे शनिवारी मध्यरात्री फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे आश्वी बुद्रुक येथील गायरान परिसरातील आठ कुटुंबांना त्याचा धोका निर्माण होणार असल्याने संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी एस. आर. चतुरे कामगार तलाठी संग्राम देशमुख, सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, आश्वी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार शांताराम झोडगे, अशोक शिंदे, पारधी राजेंद्र, साठे, महिला काॅन्सटेबल तारा चांडे आदिनी गायरानात धाव घेऊन तेथील आठ कुटुंबांना आश्वी बुद्रुक येथील आश्वी इग्लिश स्कूल आश्वी मध्ये सुरक्षित स्थलांतरित केले आहे.