संगमनेर Live | ग्रामविकास विभागा अंतर्गत आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक कार्यरत असून १० वर्ष प्रामाणिक काम केलेल्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी नी केलेली असताना संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीला बगल देऊन आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणार्या कंपनीला परत काम दिले व संगणक परिचालकांच्या मानधनात १००० रुपये वाढ करून जखमेवर मीठ चोळण्यात आल्याचे संगणक परिचालकाचे म्हणने आहे.
त्यामुळे शासनाने १४ जानेवारी २०२१ रोजी चे दोन्ही शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी संगमनेर पंचायत समिती कार्यालयासमोर काळ्या फिती लावत, निदर्शने करून शासन निर्णयाची सोमवारी होळी करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी सुरेश शिदें यानी संगणक परिचालकांचे निवेदन स्विकारले.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात आले असून शासनाने त्वरित निर्णय रद्द न केल्यास लवकरच मुंबईत आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश निर्मळ यांनी सांगितले. यावेळी आदोंलक संगणक परिचालकानी संगमनेर पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून घोषणाबाजी व निदर्शने करून परिसर दणाणून सोडला होता.
दरम्यान यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश निर्मळ, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक काळे, तालुकाध्यक्ष अतुल गोर्डे, तालुका उपाध्यक्ष कांचन वर्पे, उषा डावरे, विराज देशमुख, शिरीष इंगळे, राम डोंगरे, रेश्मा कुलधरण आदिसह मोठ्या संख्येने पुरुष व महिला संगणक परिचालक उपस्थित होते.