संगमनेर Live मुंबई | राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन अर्थसंकल्पातून किमान वेतन देणे व आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc - spv या दिल्लीच्या कंपनीवर कारवाई करणे या मागण्यासाठी आझाद मैदानावर ४ दिवसापासून आदोंलन सुरू आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या न सोडवल्यामुळे संगणक परिचालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
मागील दहा वर्षांपासून संग्राम व आपले सरकार या दोन्ही प्रकल्पात प्रामाणिकपणे काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामावून घेऊन किमान वेतन देणे, आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुमारे ३९२ कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या दिल्लीच्या csc - spv कंपनीवर कारवाई करणे या मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे संगणक परिचालकांचे २२ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन रात्रंदिवस सुरू आहे. परंतु ग्रामविकासमंत्री यांनी संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याबाबत आडमुठेपणाची भूमिका घेतलेली असून दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc - spv कंपनीला कुठलेच टेंडर प्रक्रिया न राबवता व मंत्रिमंडळ किंवा उच्चस्तरीय समितीची मान्यता न घेताच सुमारे १३७४ कोटींचे ५ वर्षासाठी या प्रकल्पाचे टेंडर दिले आहे, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्याकडे संघटना व अनेक लोकप्रतिनिधीच्या वतीने कंपनीच्या गैरप्रकाराबाबत अनेक तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी साधी चौकशी केली नाही उलट त्याच कंपनीला काम दिले, याच्यात काय गोडबंगाल आहे, याची चर्चा सर्वत्र सुरू असल्याचे आदोंलकाचे म्हणने आहे.
मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेनी या प्रकरणात लक्ष देऊन प्रश्न सोडवण्याची गरज..
राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असताना त्यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या संगणक परिचालकांच्या आंदोलनाला भेट देऊन आय टी महामंडळात घेऊन किमान वेतन देण्याचे वचन दिले होते. प्रश्न सुटे पर्यन्त शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत व त्यांच्याकडेच आय टी विभाग असताना अद्याप त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. त्यामुळे त्यांनी लक्ष देऊन ग्रामीण भागातील संगणक परिचालकांना न्याय दयावा अशी मागणी संगणक परिचालक करत आहेत.
आंदोलकांना आझाद मैदानात पिण्याचे पाणी देण्यास प्रशासनाचा नकार ; लाईट, स्पीकर तोडले, आंदोलकांना मैदानात येण्यापासून रोखले.
आज बेमुदत धरणे आंदोलनाचा ५ वा दिवस असून आपल्या न्याय मागणीसाठी मागील ४ दिवसापासून रात्रंदिवस आंदोलन सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील संगणक परिचालकांना आझाद मैदानावर जे टॅकर द्वारे पाणी मिळत होते, आज आलेले टँकर पोलीस प्रशासनाने वापस पाठवले, स्पीकर बंद केले व रात्री मैदानावरील लाईट तोडली, एकूणच आंदोलकांनी आंदोलन करू नये म्हणून शासन प्रयत्न करत आहे. परंतु उद्धव साहेबांच्या शासनात ग्रामीण भागातील तरुणांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मागणी मान्य होई पर्यंत आझाद मैदान सोडणार नाहीत - निलेश निर्मळ
आमची न्याय मागणी असून मागील १० वर्षापासून प्रामाणिक काम केल्यामुळे आय टी महामंडळात कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देणे या मागणीचा निर्णय शासनाने घेणे आवश्यक आहे. परंतु शासन निर्णय घेत नसल्यामुळे जो पर्यंत शासन मागणी मान्य करणार नाही तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा निर्धार संगणक परिचालकानी केला असल्याचे संघटनेचे अहमदनगर जिल्हाअध्यक्ष निलेश निर्मळ यांनी सांगितले.