◻ ना. थोरातानी केल्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना.
संगमनेर Live | कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अतिशय चांगले निर्णय घेत कोरोना रुग्ण वाढ थांबवण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. याला नागरिकांचे सहकार्य मिळणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येकाने स्वतःची व स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे. गावातील ग्रामरक्षक दल व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करावी व लक्षणे असणाऱ्यांचे तातडीने विलगीकरण करा अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जोर्वे व आश्वी गटातील विविध गावातील प्रमुख नागरिकांशी आश्वी व पिंपरणे येथे संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, गणपतराव सांगळे, सुरेश थोरात, दत्तू खुळे, विजय हिंगे, प्रांताअधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर, डॉ. मदने आदी उपस्थित होते.
यावेळी नामदार थोरात म्हणाले की, कोरोनाचा हा काळ अत्यंत संकटाचा आहे. यामध्ये कोणीही निष्काळजीपणा करू नका. आपल्या नागरिकांना जपणे अत्यंत गरजेचे आहे. मी सातत्याने राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आढावा घेत असून ही कोरोणा वाढ थांबवणे हे सर्वांना पुढील आव्हान आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक टेस्ट झाले आहेत त्यामुळे रुग्ण वाढ झालेली दिसते. मात्र त्यातून आपल्याला ज्यांना लक्षणे झाली आहे त्यांना तातडीने विलगीकरण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अनेक जणांचा धोका टाळला आहे.
म्यूकरमायकोसीस चा धोकाही मोठा आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःची व स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर प्रशासनाने करावा. घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करा. एखाद्या व्यक्तीला जर काही लक्षणे आढळली तर त्याचे तातडीने विलगीकरण करा. या सर्व संकटात अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांनीही खूप मोठे काम केले असून या सर्वांचे काम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, स्वतःची काळजी घेणे हाच कोरोनावर उपाय आहे. निष्काळजीपणे टाळा, विनाकारण गर्दी करू नका, घरगुती समारंभ पूर्णपणे टाळा, भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे असून त्यानंतर सर्व गोष्टी आहेत. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात प्रशासन अत्यंत चांगले काम करत आहेत त्याला आपण सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. गावोगावी तरुणांनी पुढे येत पूर्ण मुक्त गाव राबवण्यासाठी काम करावे असेही ते म्हणाले.
यावेळी सदाशिव वाकचौरे, अण्णा राहिंज, सुनील जोशी, विठ्ठल असावा, चणेगावचे सरपंच खेमनर, अशोक वाणी, भिमाजी राहिंज, विक्रम थोरात, दिलावर शेख, प्रमोद बोंद्रे, डॉ. संजय सांगळे, बाबा गायकवाड, शहाजी खेमनर, दत्तू नागरे, प्रमोद बोंद्रे आदींसह गावातील प्रमुख उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय हिंगे यांनी केले तर डॉ. संजय सांगळे यांनी सूत्रसंचालन केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने लॉकडॉऊनचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जीवनाश्यक वस्तू नियमावली लावण्यात आली, मात्र अवैध दारु विक्रीला नियमावलीचं नसल्याने अवैध दारुच्या माध्यमातून होणाऱ्या गर्दीमुळे आश्वी व परिसरात रुग्ण वाढल्यास पोलिसांना जबाबदार धरले जाईल. तर अवैध दारुविक्री त्वरीत बंद करण्याचा सुचक इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
