आघाडी सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच ओबीसीना आरक्षण गमवावे लागले - आ. विखे पाटील

संगमनेर Live
0

ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका न घेण्याची मागणी

संगमनेर Live (शिर्डी) | ओबीसी आरक्षणच्‍या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे वाया घालविली. आघाडी सरकारच्‍या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाला आपले राजकीय आरक्षण गमवावे लागले असल्‍याचा आरोप आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका घेवू नयेत अशी मागणी त्‍यांनी केली.

राज्‍यातील आघाडी सरकारने ओबीसी समाजाच्‍या राजकीय आरक्षणाबाबत कोणतीही पाऊलं गांभिर्याने टाकली नाहीत. मार्च २०२१ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाने हे आरक्षण रद्द करणारा निकाल दिल्‍यानंतरही हे सरकार जागे झाले नाही. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या सुचनेनुसार इम्पिरीकल डेटा गोळा झाला असता तर, या समाजाला राजकीय आरक्षण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये परत मिळाले असते.

मात्र या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमण्‍याचीही तसदी घेतली नाही त्‍यामुळे डेटा गोळा करण्‍याचे काम होवू शकले नाही. याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्‍हणाले की, आघाडी सरकारमधील मंत्री केंद्राकडे बोट दाखवून डेटा देण्‍याची मागणी करीत होते. परंतू असा राजकीय डेटा गोळा करण्‍याची जबाबदारी केंद्राची नाही तर राज्‍याची होती याचा सोईस्‍कर विसर आघाडीच्‍या नेत्‍यांना पडला. त्‍यामुळे राज्‍य सरकारचे केवळ वेळाकाढू धोरण सर्वोच्‍च न्‍यायालयात गुरुवारी उघडे पडल्‍याची टिका आ. विखे पाटील यांनी केली.

मागासवर्गीय आयोगाला पुरेसा निधीही आघाडी सरकार उपलब्‍ध करुन देवू शकले नाही. न्‍यायालयात सादर केलेल्‍या अहवालातही त्रृटी समोर आल्या. न्‍यायालयाने चपराक दिल्‍यानंतर घाईघाईमध्‍ये काल ३४ कंत्राटी कामगार देण्‍याचा अध्‍यादेश काढला. 

यावरुनच ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये हीच भूमिका आघाडी सरकारची असल्‍याचे आता स्‍प्‍ष्‍ट झाले आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका घेवू नयेत अशी मागणी आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !