◻️ आश्वी ते साकूर रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य
◻️ जड वाहणे तर सोडा दुचाकी व पायी चालणे ही झाले अवघड
◻️ या रस्त्याला थिगंळ लावून प्रश्न मिटेल का.?
◻️ रस्त्याच्या दुरावस्थेचे पाप कोणाच्या पदारात
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी ते साकूर या २५ ते ३० किमी लांबीचा सध्या मरणावस्थेत असून ‘रस्त्यात खड्डे की, खड्डयात रस्ता’ हे सांगणे ही या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकासाठी कठीण झाले आहे. सध्या या रस्त्यावर थिगंळ (डागडूजी) लावण्याचे काम काही ठिकाणी सुरु असले तरी, या रस्त्यावरील जीवघेणा प्रवास कधी संपणार हे मात्र मागील अनेक वर्षापासून न सुटलेले कोडे असल्याने नागरीकाच्या मनात मोठा रोष निर्माण झाला आहे.
आश्वी - साकूर हा रस्ता हा दळवळणाच्या दृष्टिकोणातून अतिशय महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर आश्वी, शिबलापूर, पानोडी, वरंवडी, कोठे - मलकापूर व साकूर यासह पंचक्रोशीतील शेकडो गावे या - ना त्या कारणाने या रस्त्याला जोडली गेली आहेत. पुणे, आळेफाटा, पारनेर तसेच लोणी, संगमनेर, नाशिक, शिर्डी, श्रीरामपूर व नगरकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. तालुक्यातील पहिला खाजगी साखर कारखाना ही याचं रस्त्यावर आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोणातून हा रस्ता होणे गरजेचे आहे. परंतू लहान - मोठ्या विकासाचे श्रेय घेण्यासाठी धडपडणारे नेते मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेचे पाप आपल्या पदारात घ्यायाला तयार नाहीत.
पानोडी ते साकूर पर्यंत हा रस्ता पुर्णपणे उखडला असून खड्यानी केलेल्या गर्दीमुळे रोज या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असल्याने अनेकानी आपले जीव गमावले आहेत. तर अनेकाना कायमचे आपगंत्व आले आहे. अनेक ठिकाणी शेतातील व ओढ्या - नाल्यातील पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याने ठिक - ठिकाणी गुडघ्याइतके डबके साचले आहेत. या पाण्यामुळे एक दोन ठिकाणी रस्ता वाहून सुध्दा गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरीका जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी अक्षरश: कसरत करत या रस्त्यावरुन येत जात असल्याने पालकाचा जीव टागणीला लागलेला असतो.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्यासाठी ५ कोटी मंजूर केले होते. परंतू बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार मात्र या रस्त्याचे काम का करत नाही हे न सुटलेले कोडे आहे. त्यामुळे रस्त्यासाठी निधीचे केवळ कागदी घोडे नाचवून लोकाना मृगजळ दाखवले अशी चर्चा आता होऊ लागली असून दिवसेंदिवस नागरीकानमध्ये रोष वाढत चालला आहे.