◻️ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्र निषेध
संगमनेर LIVE | जालना जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. हवेत गोळीबार केला. पोलिसांच्या या अमानुष कृतीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.
देशभरातील सर्व प्रमुख विरोधी नेते इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रात हजर असताना आंदोलकांवर झालेला हल्ला म्हणजे राज्य सरकार कुणालाच जुमानत नसल्याचे व विरोध करणारांना चिरडून काढणार असल्याचा संदेश देणारे आहे. राज्य सरकारचा हा दृष्टिकोन अत्यंत निषेधार्ह असल्याचे माकपचे सचिव डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
२९ ऑगस्टपासून मराठा मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह काहीजण आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण कार्यकर्तेही सराटी गावात उपस्थित होते. पण, उपोषकर्त्यांनी उपचार घ्यावेत, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद निर्माण झाला.
यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये पोलिसांसह गावकरीही जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.