विद्यार्थ्यानी समाज माध्यमापासून दूर राहणे गरजेचे - पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे

संगमनेर Live
0
◻️ आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती उत्साहात साजरी

◻️ मुलींसाठी ‘गुड टच, बॅड टच’ शिक्षणाची गरज


संगमनेर LIVE | बहुजनाना म्हणजे सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्यामुळे तीन ते चार पिढ्या शिक्षित झाल्या. कर्मवीराच्या काळातील अडी अडचणी वेगळ्या होत्या. मात्र सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात अपप्रवृत्ती कार्यरत झाल्याने विद्यार्थ्यानी विशेषतः मुलींनी समाज माध्यमापासून दूर राहणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना पोलीस उप अधीक्षक वाकचौरे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सीताराम चांडे होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, जेष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण होडगर, विनायकराव बालोटे, किशोर जऱ्हाड, सुमतीलाल गांधी, तानाजी गायकवाड, ब्रिजमोहन बिहाणी, प्रशांत कोळपकर, केदार बिहाणी, अशोक गोसावी, माजी मुख्याध्यापक मांढरे, भिमाशंकर सारबंदे, सौ. शकुंतला चिंतामणी, पत्रकार संजय गायकवाड, रविंद्र बालोटे, अनिल शेळके, अण्णा ताजणे, माजी प्राचार्य उंबरकर, सुनील गायकवाड, रामनाथ जऱ्हाड, अमोल राखपसरे, जाखोबा पिलगर, भाऊसाहेब डोईफोडे, पोलीस नाईक विनोद गभिंरे आदिसह स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना पोलीस उप अधीक्षक वाकचौरे म्हणाले की, समाजात विविध अपप्रवृत्ती वाढत असून मुलींसाठी ‘गुड टच, बॅड टच’ या शिक्षणाची गरज असल्याचे सांगून यासाठी शाळेने प्रयत्न केल्यास मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी महिला अधिकारी पाठवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच शिक्षक व प्राचार्य यांना बाल न्याय अधिनियम, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व रॅगिंग कायदा माहित असणे गरजेचे असल्याचे सांगून मुलीनी मोबाईलवर फेसबुक व इन्स्टाग्रामचा वापर सुरक्षित व जबाबदारीने करावा अन्यथा तुमची सुरक्षितता धोक्यात येईल असे सांगितले.

यावेळी शाळेचे माजी पर्यवेक्षक व प्रमुख वक्ते पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात “समोर बसलेल्या माझ्या देवानो आणि देवतानो” अशी करत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवला. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे व कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सीताराम चांडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान या सुदंर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जनार्दन बर्डे यांनी केले. सुत्रसंचालन श्रीमती गाढे यांनी तर आभार श्रीमती ससाणे यांनी मानले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !