◻️ समन्यायी कायद्याला संगमनेरनेच प्रथम विरोध केला
◻️ थोरात कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
संगमनेर LIVE | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी नैतिकतेच्या पायावर येथील सहकार उभा केला आहे. सर्व सहकारी संस्थांचा आलेख चढता क्रमाने आहे. कारखान्याने अत्यंत अडचणीतून चांगले काम करताना यावर्षी १० लाख मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. आगामी काळात कार्यक्षेत्रात ऊस वाढवण्याबरोबर एकरी शंभर टन उत्पादन होण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असून यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन २ हजार ८३५ रुपये भाव दिला जाणार असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढीबरोबर उत्पादकांनी आधुनिक प्रणालीचा वापर करून कमीत कमी एकरी शंभर मे. टन उत्पादन होईल यासाठी काम केले पाहिजे. कमी खर्च, कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे सूत्र घेतले तर ऊसाला जादा भाव देता येईल.
यावर्षी कारखान्याने दहा लाख मे. टनाचे गाळप केले असून याबरोबर सहा कोटी बावीस लाख युनिटची वीज निर्मिती, अल्कोहोल निर्मिती, रूफ टॉप वीज निर्मिती, विविध खतांची निर्मिती केली आहे. सीएनजी पेट्रोल पंप सुरू केला असून आगामी काळात ग्रीन हायड्रोजन प्रकल्प येतो ही यशस्वी वाटचाल सुरू आहे. यावर्षी कार्यक्षेत्राबाहेरील २ हजार ७१५ रुपये प्रति टनाने भाव तर कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकाम करता २ हजार ८३५ रुपये भाव दिला जाणार आहे.
निळवंडे धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला २०१४ ते १९ कालव्यांची कामे थंडावली होती. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येतात रात्रंदिवस कामाला गती दिली. कोरोना काळातही या कामाचा पाठपुरावा केला. आपले सरकार असते तर डाव्या कालव्यातून दोनदा आणि उजव्या कालातून एकदा पाणी दिले असते. पाणी तालुक्यात आले आपण मोठा आनंदोत्सव साजरा केला. मात्र हा आनंद काहींना पहावत नसल्याने तातडीने पाणी बंद केले. यावर्षी अत्यंत कमी पाऊस आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. भोजापुर धरण भरत आहे तर राजकीय फोनाफोनी सुरू आहे यामुळे पाणी वाया जाण्याची भीती आहे.
तालुक्यातील विकास कामांना स्थगिती दिली आहे. दहशत निर्माण करून विकास कामे रोखले जाणे हे अत्यंत चुकीचे आहे. पण यामुळे विकास थांबणार नाही. असा इशारा देताना गणेश कारखाना आठ वर्षे त्यांना चालवता आला नाही. तो कारखाना चांगला असून त्या क्षेत्रात ऊस उत्पादन चांगले आहे. तेथील सभासद, कामगार यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. ते सर्व आपल्या पाठीशी भक्कम असून या कारखान्याच्या कर्जाला काही लोक अडथळे निर्माण करत आहे. मात्र अडचणींवर मात करून तो कारखाना चांगला चालेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, माजी आमदार डॉ तांबे आदींनी मनोगत व्यक्त केले.
समन्यायी कायद्याविरोधात आपणच संघर्ष केला..
२०१४ मध्ये राष्ट्रपती राजवट असताना समन्यायी कायदा लागू झाला. मात्र या कायद्यातील त्रुटींबाबत आपण सातत्याने आवाज उठवला. या कायद्याच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील जनता एकत्र येऊन तालुका बंद ठेवून तीव्र आंदोलने केली. मोर्चे काढले, संघर्ष केला, या कायद्याविरोधात आपली न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू आहे. मात्र संघर्षाच्या वेळेस अनेक पुढारी गप्प बसून होते अशी टीकाही आमदार थोरात यांनी केली आहे.