◻️ समन्यायी पाणी वाटपाचे तत्व मान्य नाही
◻️ थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर मागील ५६ वर्षात यशस्वी वाटचाल केली असून सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि जनतेचा विश्वास हेच आपले मोठे भांडवल आहे. समन्यायी पाणी वाटपाचे तत्व आपल्याला मान्य नाही. याबाबत संगमनेरनेच पहिला आवाज उठवला असून निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठीच आपण पूर्ण केले असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२३ - २४ या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ हे होते. व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, सुधाकर जोशी, इंद्रजीत थोरात, उत्कर्षाताई रुपवते, व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुरेश थोरात, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, हौशीराम सोनवणे, सौ. सुनंदाताई जोरवेकर, सौ. अर्चनाताई बलोडे, सौ. निर्मलाताई राऊत, ॲड. प्रदीप मालपानी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ. हिराबाई व मिनानाथ वर्पे, सौ. सुरेखाताई व डॉ. तुषार दिघे, सौ. लताताई व माणिकराव यादव, सौ. सिंधुताई व संभाजीराव वाकचौरे, सौ. मंदाताई व शेखर वाघ या संचालकांच्या हस्ते विधिवत पूजा झाली.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, नवीन कारखान्यासोबत को - जनरेशन चा निर्णय योग्य ठरला. मागील ५६ वर्षात कारखान्यासह सहकाराची अत्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. नवीन कारखान्यातून मागील सात वर्षात ७३ लाख मे. टनाचे गाळप झाले मागील असून को - जनरेशन ला राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत.
सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक या सर्वांचा मोठा विश्वास कारखान्यावर असून हेच आपल्यासाठी मोठे भांडवल आहे. यावर्षी पाऊस कमी झाला असून दुष्काळी परिस्थितीमुळे हा हंगाम कठीण आहे. समन्यायी पाणी वाटपाचे तत्व काळजीवाहू सरकारच्या काळात अधिकारी पातळीवर ठरवले गेले. हे तत्व आपल्याला मान्य नाही. या विरोधात संगमनेरनेच प्रथम आवाज उठवला, आंदोलने केली.
निळवंडे धरण व कालवे हे आपण दुष्काळी भागातील जनतेसाठीच बांधले आहे. शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी हे काम पूर्ण केले आहे. खरे तर मे महिन्यामध्ये दहा टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यावेळेस सर्व बंधारे, नाले भरून घेता आले असते. मात्र संगमनेर तालुक्यात साजरा झालेला आनंदोस्तव काहींना पाहावला नाही. त्यावेळेस पाणी बंद केले.
सध्या अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहेत. मात्र हा तालुका क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा आहे. कठीण परिस्थितीला धाडसाने सामोरे जाणार आहोत. सत्ता येते आणि जाते. आगामी काळ हा आपलाच असून काँग्रेसचे सरकार येणार असल्याचे सांगताना आपण कधीही कुणाची वाईट केले नाही. चांगले करण्यासाठीच गणेश परिसरात आपण गेलो आहोत असेही ते म्हणाले.
मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सर्वाधिक २८३५ रुपये भाव दिला आहे. निळवंडे धरण कोणी केले हे सर्वश्रुत आहे. काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता त्यांना ओळखून आहे. राजहंस हा सहकाराचा बँड असून तो विवेकाचा ब्रँड आहे. दुष्काळी तालुक्यातील सहकार राज्यात प्रथम क्रमांकाचा केवळ नेतृत्वामध्ये ठरला आहे. सरकारने सुरू केलेली खाजगी शिक्षणाची व कंत्राटीकरणाची पद्धत अत्यंत चुकीची असल्याची टीकाही डॉ. तांबे यांनी केली
बाबा ओहोळ म्हणाले की, हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून कारखान्याने अनेक विभागात आटोमयझेशन केले आहे. कमी पाऊस असल्याने हे वर्ष आव्हानात्मक आहे. मात्र तरीही यशस्वी वाटचाल कायम ठेवू. तालुक्यातील विकासाच्या काही लोक आड येत असून त्यांना बाजूला करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, संपतराव गोडगे, इंद्रजीत खेमनर, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, अनिल काळे, श्रीमती मीराबाई वर्पे, रामदास वाघ आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.
कारखान्यातील हाउसकीपिंग व स्वच्छता कौतुकास्पद..
प्रत्येक जण आपुलकीने काम करत असल्याने कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून कारखान्यातील स्वच्छता, हाऊस कीपिंग ही अगदी कार्पोरेट सारखी असून येथील प्रसन्न वातावरण हेच चांगल्या कामाचे प्रतीक असल्याचे काँग्रेस नेते आमदार थोरात यांनी म्हटले आहे.