भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासह सुशोभीकरण - आमदार सत्यजित तांबे
◻️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार
◻️ संविधान प्रतिमासह स्वातंत्र्यसैनिक स्मारक
संगमनेर LIVE | जगातील सर्वात मोठी लोकशाही व राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व मानवतेचा विचार सर्वांनी पुढे घेऊन जाणे गरजेचे असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासह सुशोभीकरण, संविधान प्रतिमा व स्वातंत्र्य सैनिक स्मारक होणार असल्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत उत्कर्षाताई रुपवते, गौतम गायकवाड, श्रीमती कुसुमताई माघाडे, के. एस. गायकवाड, विनय घोसाळे, विलास दारोळे, विनोद गायकवाड, भास्कर बागुल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली. हा समतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे . राष्ट्रबांधणीच्या विचारावर आजच्या दिवशी देवाण-घेवाण होणे महत्त्वाचे आहे.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण केले जाणार असून भव्य स्मारक उभारले जाणार आहे. तसेच याच परिसरात संविधानाची प्रतिमा तयार करून त्याच्या जवळच शाहू - फुले- आंबेडकरांच्या विचारांचे अद्यावत व आकर्षक स्मारक निर्माण केले जाणार आहे.
बस स्थानकाच्या परिसरात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा करण्याचे नियोजित आहे. तर याच परिसरामध्ये संगमनेर तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेले तसेच शहीद झालेले स्वातंत्र्य सैनिक यांच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव स्मारक उभारले जाणार आहे. याचबरोबर या स्मारक परिसरात शंभर फुटी तिरंगा झेंडा उभारण्याचा मानस असल्याचेही आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.