विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना मुंगीसारखी जिद्द ठेवली पाहिजे - डॉ. तात्याराव लहाने
◻️वाचन, मनन, चिंतन, सातत्य व नियोजन ही सूत्रे अंगीकारण्याचे केले आवाहन
◻️ कॉ. पी. बी. कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांना प्रदान
संगमनेर LIVE (सात्रळ) | वाचन, मनन, चिंतन, सातत्य व नियोजन ही सूत्रे विद्यार्थ्यांनी ठेवल्यास त्यांना आयुष्यात कधीच अपयश येणार नाही असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या कडू पाटील शैक्षणिक संकुलात कॉम्रेड पी. बी. कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार व शांताबाई कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. लहाने बोलत होते. यावेळी कॉ. पी. बी. कडू पाटील समाजक्रांती पुरस्कार पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांना आदर्श गावचे माजी सरपंच भास्कर पेरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडुरंग अभंग होते. यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, सुरेश वाबळे, सुरेश लगड, बाळासाहेब केरूनाथ विखे, डॉ. अजित पाटील, मंगलताई राजळे, मीनाताई विखे, अर्जुन राजळे, डॉ. घावटे, प्रभाताई घोगरे, प्राचार्य गहिनीनाथ विखे, अच्युतराव बनकर, सुधीर म्हस्के, ॲड. विजय कडू, संभाजी चोरमुंगे, किरण कडू, पंकज कडू, विक्रांत कडू आदि उपस्थित होते.
माणसाला जर आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर, माणसाने आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे गेले पाहिजे तसेच शिक्षण घेताना आपण मुंगीसारखी जिद्द ठेवली पाहिजे. खरंतर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कला गुणांनाही वाव दिला पाहिजे. असेही पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
माजी सरपंच भास्कर पेरे म्हणाले की, माणसानं कधीच रडायचं नसतं, फक्त लढायचं असतं. आपल्या कामात देवाला बघायचे. म्हणजेच देशसेवा हीच ईश्वर सेवा अशी भावना आपण बाळगली पाहिजे. यावेळी पांडुरंग अभंग यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले व मंगेश कडलग यांनी केले. आभार रयतचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी मानले.