जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत व निष्ठावंत नेतृत्व - डॉ. अमोल कोल्हे

संगमनेर Live
0
जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत व निष्ठावंत नेतृत्व - डॉ. अमोल कोल्हे

◻️ दिल्ली समोर स्वाभिमानी महाराष्ट्र झुकणार नाही - खासदार डॉ. अमोल कोल्हे

◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा दिमाखदार अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

संगमनेर LlVE| हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा समृद्ध इतिहास महाराष्ट्राला आहे. इतिहास हा फक्त घोषणा देण्यासाठी नसून प्रेरणा देत असतो. स्वाभिमानी महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही असे सांगताना सातत्याने जनतेमध्ये राहून गोरगरीब व सर्वसामान्यांचा शाश्वत विकास करणारे निष्ठावंत असलेले नामदार बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असल्याचे गौरवोद्गार युवा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले आहे.

जाणता राजा मैदान येथे संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जेष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार निलेश लंके, आमदार सत्यजित तांबे, सत्यशील शेरकर, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब डांगरे, डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीत सिंह देशमुख, मनीष मालपाणी, उत्कर्षा रुपवते, इंद्रजीत थोरात आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कायम जमिनीशी नाळ जोडून ठेवली आहे. सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजय होताना त्यांनी शाश्वत विकासावर भर दिला आहे. महाराष्ट्राचा सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासला आहे. निष्ठावंत आणि सुसंस्कृत नेतृत्व अशी त्यांची राज्यात ओळख आहे. हे नेतृत्व आपल्या सर्वांना जपायचे आहे.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे संभाजी महाराज यांचा समृद्ध परंपरेचा इतिहास आहे. संकटे आले की लढाईची असते पळायचे नसते. हा स्वाभिमानाचा इतिहास प्रत्येकाने जोपासला पाहिजे महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार सुद्धा नाही. हा विचार प्रत्येकाने मनात ठेवा.

ज्या संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे. ते संविधान आणि देश वाचवण्यासाठी काम करा. मतदान कक्षात गेल्यानंतर पाच मिनिट वेळ लागतो, बटन दाबण्यासाठी पाच सेकंद लागतात. मात्र या पाच सेकंदांनी पाच वर्षाचे देशाचे भवितव्य बदलते म्हणून अत्यंत काळजीपूर्वक मतदान करा. हा अधिकार ज्या राज्यघटनेने दिला आहे. तो राज्यघटनेचा विचार सध्या धोक्यात आहे. राज्यघटना, संविधान आणि देश टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना लढायचे आहे.

देशात सध्या महागाई वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, अनेकांचा रोजगार हिरावला जातो आहे. महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे पळवले जात आहेत. कांदा निर्यात बंदी केली आहे. हि अत्यंत कठीण परिस्थिती आहे. फक्त जाहिरातबाजी आणि भाषणबाजीवर न जाता राज्याचा इतिहास समजून घ्या. देशाचे भवितव्य समजून घ्या असे सांगताना प्रत्येकाने देश वाचवण्यासाठी कटिबद्ध रहा असे आव्हानही त्यांनी केले.

आमदार थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा विचार आपण जपला आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेने कायम आपल्यावर प्रेम केले आहे. जनता ही आई आहे. विकासामध्ये आपण कधीही राजकारण केले नाही. सर्वांना बरोबर घेत विकासाचे काम केले. संगमनेरच्या जनतेमुळे आणि पक्षाच्या नेतृत्वामुळे राज्यात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आणि राज्यातील गोरगरीब जनतेसाठी केला.

निळवंडे धरण व दोन्ही कालवे पूर्ण करून आता पाणी आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे. ही विकासाची वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे. मात्र यामध्ये काही लोक अडचणी निर्माण करून पाहत आहेत. अशा लोकांना वेळीच दूर करा.

देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. महागाई ,बेरोजगारी वाढली आहे. मूळ मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. काँग्रेस हा राज्यघटनेचा व संत परंपरेच्या समतेचा विचार असून या विचारावर आपण काम करत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मधुकर भावे म्हणाले की, राज्याला आ. बाळासाहेब थोरात व खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले.

हजारो नागरिकांच्या उपस्थिती बाळासाहेब थोरात यांचे जंगी स्वागत व अभिष्टचिंतन..

लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त जाणता राजा मैदानावर सुमारे ६० हजार नागरिकांची मोठी उपस्थिती होती. आमदार थोरात व डॉ. कोल्हे यांचे आगमन होताच प्रचंड टाळ्यांच्या कडकटासह आकर्षक आतिषबाजी झाली. रस्त्यांच्या दुतर्फावरून आमदार थोरात यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर उपस्थित अलोट जनसमुदायाने मोबाईल टॉर्च ऑन करून तारांगणाचा नजारा दाखवत टाळ्यांच्या कडकडाटासह अभूतपूर्व स्वागतात आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिष्टचिंतन केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !