शेतकरी व मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प - माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात
◻️ आकड्यांपेक्षा राजकीय आत्मविश्वासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - सत्यजित तांबे
संगमनेर LIVE | संपूर्ण मध्यमवर्ग महागाईने होरपळतो आहे. अशावेळी त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. महागाईवर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांसाठी व मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही मदत नसणारे हा अर्थसंकल्प पूर्णपणे निराशा जनक असल्याची टीका माजी मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून सत्ताधारी मीडियाच्या साह्याने हरलेल्या डावाचा जयजयकार करतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना आमदार थोरात म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा घोर निराशाजनक आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर शेअर बाजारामधील घडामोडी अवलंबून असतात. मात्र यावेळेस शेअर बाजार पूर्णपणे ठप्प आहे.
संपूर्ण मध्यमवर्ग महागाई मध्ये होरपळत आहे. अशा वेळेस त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. भरमसाठ वाढलेल्या महागाईवर सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. शेतकऱ्यांना मदत केली असे सांगतात परंतु दुर्दैवाने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केलेली नाही.
राज्यांच्या हक्काचे निधी केंद्र सरकारकडे थकलेले आहेत. त्यातून राज्यांना दिलासा मिळाला नाही. यामुळे या राज्यांना प्रगती करणे सुद्धा अवघड जाणार आहे. एकूणच संपूर्ण निराशजनक असलेला हा अर्थसंकल्प असून सत्ताधारी मात्र हरलेल्या डावाचा जयजयकार मीडियाच्या साह्याने करतील. मात्र जनता पूर्णपणे नाराज आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
आकड्यांपेक्षा राजकीय आत्मविश्वासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प - सत्यजित तांबे
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतरिम अर्थसंकल्प मांडतांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मागील १० वर्षांतील देशाच्या प्रगतीतील सकारात्मक आकडेवारी जाणीवपूर्वक मांडण्याचं व नकारात्मक आकडेवारी झाकण्याचं राजकीय चातुर्य दाखवलं आहे. कोणतीही ठोस नवी घोषणा न करता या आधीच्या योजनांचं यश मांडत अर्थमंत्र्यांनी मिळालेल्या संधीचं उत्तम सोनं केलं आहे.
नवीन हॉस्पिटलस्, कॉलेज, नव्या योजना अशा घोषणा कोणत्याही पक्षाच्या प्रत्येक अर्थसंकल्पात होतात. त्याची अंमलबजावणीही कमी जास्त प्रमाणात होतंच असते, मात्र निवडणूक असूनही कर पद्धतीची पुनर्रचना, विशिष्ट घटकांसाठी भरगोस तरतूद अशा कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करता, समतोल अर्थसंकल्प मांडला गेला आहे. यातूनच निवडणुकांना सामोरं जाताना सरकारचा राजकीय आत्मविश्वास दिसून येतो, आता हा आत्मविश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे काळच ठरवेल. अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.