बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा!
◻️ ६० ते ७० च्या दशकात श्रीरामपूरात दिवसातून दोनदा वाजणारा भोगा ते बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा
◻️ जेष्ठ पत्रकार कॅमिल पारखे यांनी आपल्या कुंचल्यातून उलगडलेला इतिहास नक्की वाचायला हवा..
संगमनेर LIVE | श्रीरामपूर नगरपालिकेचा भोंगा दिवसातून दोनदा वाजायचा. सकाळी सहा वाजता होणारा भोंगा बहुसंख्य लोकांच्या ध्यानीमनीही नसायचा. रात्री साडेआठ वाजता होणारा भोंगा मात्र सगळ्यांच्या कानी पडायचा आणि त्यानुसार ते त्यांचा त्या दिवसाचा दिनक्रम आटपून घेण्याच्या तयारीला लागत असत.
आमच्या घरापासून अर्ध्या किलोमीटर दूर असलेल्या, बाजारतळापाशी असलेल्या नगरपालिकेच्या संगमनेर रोडवरच्या ओपन थिएटर आवारातून हा भोंगा वाजत असे. त्याकाळी म्हणजे साठ आणि सत्तरच्या दशकांत मर्यादित सीमाहद्दी असलेल्या आणि ध्वनीप्रदूषण ही चीज ठाऊक नसलेल्या श्रीरामपूर शहराच्या बहुतेक सर्व भागांत या भोंग्याचा आवाज व्यवस्थितपणे ऐकू यायचा.
कुठल्याही प्रकारची फार मोठी स्थानिक उद्योगकंपनी नसलेल्या आणि अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असलेल्या श्रीरामपुरात दिवसातून दोनदा वाजल्या जाणाऱ्या या भोंग्याचे नक्की प्रायोजन काय होते ते मला कधीच कळाले नाही.
या शहराच्या आसपास हरेगावची ब्रिटिशकालीन बेलापूर शुगर फॅक्टरी आणि टिळकनगरची महाराष्ट्र शुगर फॅक्टरी हे दोन खाजगी साखर कारखाने आणि अशोकनगरचा सहकारी साखर कारखाना होता. पण या तिन्ही साखर कारखान्यांचा आणि नगरपालिकेच्या या भोंग्याचा काडीएक संबंध नव्हता.
पण आम्हा शहरवासियांच्या दैनंदिन जीवनात या भोंग्याला निश्तितच काहीतरी महत्त्वाचे स्थान होते हे नक्की.
इतर रहिवाश्यांप्रमाणेच सकाळच्या भोंग्याकडे माझेही कधी फार लक्ष गेले नाही पण रात्रीच्या साडेआठच्या भोंग्याची काही वेगळी बाब होती.
रात्री साडेआठ वाजता पालिकेचा तो भोंगा वाजला कि दादा लगेच दुकान आवरायला लागायचे, त्या सोनार लेनमधली आजूबाजूची दुकानेसुद्धा पटापटा बंद व्हायला लागायची. नगरपालिकेचा रात्री साडेआठचा तो भोंगा अशाप्रकारे सर्व दुकानदारांना आपापली दुकाने बंद करण्याची आठवण करुन द्यायचा.
गंमत म्हणजे याकाळात आमच्या आणि इतर सर्व दुकानांत भिंतीवर टांगलेली घड्याळे असायची, बहुतेकांकडे मनगटी घड्याळ असायचे. असे असले तरी रात्री दुकाने बंद होण्यासाठी त्या भोंग्याचाच आदेश पाळला जायचा.
हा, बुधवारचा मात्र एक अपवाद असायचा. दर बुधवारी अनेक दुकाने रात्री आठ वाजण्याआधीच बंद व्हायची, याचे कारण म्हणजे त्याकाळात रेडीओ सिलोनवरून प्रसारीत होणारी अमीन सयानी यांचा ‘बिनाका गीतमाला' हा नवनवीन 'हिट' हिंदी चित्रपट गाण्यांचा त्याकाळचा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम.
त्यादिवशी रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत घरांघरांत कुटुंबातली सर्व लहानथोर मंडळी रेडिओवरचा हा कार्यक्रम कान देऊन ऐकत असायची. देशात कृष्णधवल टेलिव्हिजनचे आगमन होण्यास त्यानंतर आणखी एक तप म्हणजे दहाबारा वर्षांचा अवधी होता.
त्याशिवाय महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला ३० जानेवारीला सकाळी बरोबर अकरा वाजता हा भोंगा वाजायचा, त्यावेळी असेल त्या जागी एक मिनिट स्तब्ध राहून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करावी अशी अपेक्षा असायची. आम्ही मुले शाळेत असताना अशाप्रकारे गांधीजींचे स्मरण करायचो.
तर श्रीरामपूर पालिकेचा रात्री साडेआठचा हा भोंगा कधी काही कारणाने वाजला नाही असे कधी व्हायचे नाही.
मात्र अचानक काही काळ श्रीरामपूर नगरपालिकेचा हा भोंगा दिवसाअपरात्री, वेळीअवेळी वाजू लागला. नेहेमीच्या परिचयाच्या त्या भोंग्यांच्या अशा कधीही वाजण्याने सुरुवातीला काही दिवस लोकांची घबराट व्हायला लागली.
अर्थात हे भोंगे असे वेळीअवेळी का वाजतायेत हे एव्हाना लोकांना माहित झाले होते.
पन्नास वर्षांपूर्वीचे म्हणजे १९७१ सालच्या डिसेंबर महिन्याचे ते दिवस होते आणि त्यावेळी भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात प्रवेश केला होता.
भारताचे पाकिस्तानविरुद्ध युद्ध सुरु झाले होते. त्यामुळे शत्रुपक्षाकडून कुठल्याही भारतीय मुलखावर कधीही हल्ला होऊ शकतो, त्यामुळे अशा हल्ल्यास लोकांनी कसे तोंड द्यायचे याची रंगीत तालिम म्हणून असे भोंगे अचानक वाजवले जात असत.
`युद्धस्थ कथा रम्य' असे एक सुभाषित असले तरी युद्धाच्या छायेत राहाणे तितके सोपे नसते. तीन डिसेंबरपासून सुरु झालेल्या या युद्धाच्या काळात सीमाहद्द वगळता भारताच्या कुठल्याही मध्यवर्ती प्रदेशांत सैनिकी किंवा बॉम्ब हल्ले झाले नाहीत,
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हे आमचे शहर देशाच्या कुठल्याही सिमेवर नाही, त्यामुळे या भागात विमानांतून शत्रुह्ल्ला होण्याची शक्यता फार धूसर होती. तरीदेखील खबरदारी म्हणून देशाच्या विविध प्रदेशांत अशी काळजी घेतली जात असावी.
त्यावर्षी मी सहावीला शिकत होतो. मात्र ज़िल्हा परिषदेच्या आमच्या जीवन शिक्षण मंदिर (खटोड) शाळेत दररोज सकाळी सामुहिक प्रार्थनेच्या वेळी वृत्तपत्रांतील प्रमुख काही बातम्यांचे मथळे वाचले जायचे. हे मथळे वाचणाऱ्या तीनचार विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश होता, त्यामुळे सकाळीच वृत्तपत्राचे पहिले पान नजरेखालून घालावे लागे.
याच काळात भारताच्या पूर्व सिमेवर अचानक भारतीय सेनेच्या मोठ्या कारवाया सुरु झाल्या होत्या आणि त्यासंबंधीच्या बातम्या विशेषतः भारतीय लष्कराच्या मदतीने आगेकूच करणाऱ्या बांगला 'मुक्ती बाहिनी'च्या फौजेला मिळणारे यश याबाबतच्या बातम्या वाचणे खूपच रोमांचकारी असायचे. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच वृत्तपत्रे वाचायची सवय लागली, ती कायमची लागलीच.
सत्तरच्या दशकात तंत्रज्ञान आणि युद्धशास्त्र आजच्या इतके प्रगत नव्हते. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे परस्परांच्या हद्दीत खूप आत जाऊन बॉम्बहल्ला करु शकत नव्हती. विमानाच्या हालचाली अचूक टिपणारी रडार यंत्रणा तोपर्यंत विकसित झाली होती,
मात्र तरीही रडार यंत्रणा भेदून शत्रूची विमाने भारतातील मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांवर हल्ला करतील अशी शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती.
म्हणूनच पाकिस्तानची विमाने भारतात शिरल्यास घ्यावयाच्या खबरदारी आणि बॉम्बवर्षाव झाल्यास काय करावे याचे मार्गदर्शन याकाळात दररोज केले जात होते हे मला स्पष्ट आठवते.
यातला आणखी एक खबरदारीचा उपाय म्हणून त्या युद्धाच्या काळात शहरात रोज रात्री ‘ब्लॅकआऊट' असायचा. शत्रूच्या विमानांना ही शहर लोकवस्ती आहे हे कळू नये म्हणून रात्रीच्या काळात असा अंधार केला जायचा. रस्त्यावरचा, दुकानांतला आणि घरांतला वीजपुरवठा पुर्णतः बंद असायचा.
त्याकाळात देशात आणि महाराष्ट्रात विजेचा फारसा वापर वाढलेला नव्हता. विद्युतीकरण केवळ काही श्रीमंत लोकांच्या घरांपर्यंत आणि दुकानांत पोहोचले होते.
आमच्या ‘पारखे टेलर्स’ दुकानात आणि सोनार लेन मधील इतर बहुतेक दुकानांत तोपर्यंत विजेचे कनेक्शन आले नव्हते, त्यामुळे सूर्यास्ताआधी सगळे दुकानदार आपापल्या पेट्रोमॅक्स बत्त्या साफसूफ करुन त्या पेटवत असत. आमच्या बोरावके चाळीत एकाही घरात वीज आलेली नव्हती, त्यामुळे रॉकेलच्या छोट्या मोठ्या बत्त्या, एकदोन कंदिल यावर संपूर्ण घरांत स्वयंपाक व्हायचा, इतर कामे उरकली जायची.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आमच्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरातही खूप कमी होती. या कारणांमुळे एरव्हीसुद्धा या तालुक्याच्या ठिकाणी संध्याकाळनंतर शत्रुपक्षाच्या विमानातून खाली जमीनीवर उजेड दिसून मानववस्तीची कल्पना येईल अशी शक्यता फार कमी होती.
या ब्लॅकआऊट उपायाव्यतिरिक्त लोकांनी बिडी - काडीसाठीसुद्धा काडी पेटीचा वापर करु नये अशी सक्त ताकिदच होती. फारच तलफ आली तर दोन्ही हातांनी झाकून म्हणजे मूठ बंद करुन विडी शिलगावी, ओढावी असा आदेश होता.
त्या दिवसांत शहरात अनेकदा वर उडणाऱ्या हेलिकॉप्टर आणि विमानांची घरघर कानावर यायची. अशी हेलिकॉप्टर्स आणि विमाने श्रीरामपुरात क्वचितच दिसायची.
शत्रुच्या विमानांचा बॉम्बहल्ला झाल्यास लगेच घराबाहेर पडावे, कुठलीही हालचाल न करता जमिनीवर झोपून राहावे अशा सूचना मिळाल्याचे आठवते.
आजही स्पष्ट आठवते कि पूर्व पाकिस्तानात स्थानिक मुक्ती बाहिनीचे लोक भारतीय फौजेसह डाक्क्याच्या दिशेने आगेकूच करताना तेथील लोक त्यांचे आनंदांने उत्फुर्त स्वागत करत होते अशा बातम्या दररोज वाचायला मिळायच्या. ते वाचून अंगावर रोमांच उभे राहायचे.
युद्ध होते तरी भारतीय फौजेने यावेळी फारशी मनुष्यहानी अनुभवली नाही किंवा भारतीय मुलखात कुठल्याही स्वरुपाची मालमत्तेची मोठी नुकसानी झाली नव्हती. उलट दररोज भारतीय सैन्याच्या नव्यानव्या शौर्यकथा वृत्तपत्रांतून वाचायाला मिळायच्या.
पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय फौजेसमोर पांढरे निशाण फडकावून बिनशर्त शरणागती पत्करली, हा या १९७१च्या युद्धाचा परमोच्च बिंदू आणि भारतीय लष्कराच्या इतिहासातील एक अत्यंत रोमांचकारी घटना.
या दिवशी पाकिस्तानी लष्कराच्या उच्चाधिकाऱ्यांनी भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसमोर शरणागतीच्या करारावर आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र माध्यमांच्या प्रतिनिधींच्या समक्ष सह्या केल्या, ही घटना सर्व जगाने पाहिली.
भारतीय लष्कराचे प्रतिनिधी जनरल जगजित सिंग अरोरा यांच्या उपस्थितीत पाकिस्तानी अधिकारी लेफ्ट. जनरल अमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी शरणागतीच्या करारावर सह्या केल्या तो एक ऐतिहासिक क्षण
बांगलादेश युद्धाच्या आधी भारताने आणि सगळ्या जगाने पंतप्रधान इंदिरा गांधींचा खंबीरपणा, राजकीय मुत्सद्दीपणा तसेच त्यामुळे अमेरिकेने केलेली आदळआपट अनुभवली होती.
यावेळी कम्युनिस्ट सोव्हिएत रशियाने भारताची केलेल्या पाठराखणीमुळे अमेरिकेला निमूटपणाने घेतलेली माघार घ्यावी लागली होती.
पाकिस्तानी लष्कराधिकाऱ्यांच्या शरणागतीमुळे युद्ध तहकुबी झाली, भारताला शरण आलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना युद्धकैदी म्हणून घोषित करण्यात आले आणि याचबरोबर बांगलादेश हे नवे राष्ट्र जगाच्या भूगोलावर अस्तित्त्वात आले.
ब्रिटिशांच्या ताब्यातील इंडियाला स्वातंत्र्य मिळाले त्या १९४७ साली भारत आणि पाकिस्तान ही दोन नवी राष्ट्रे जन्माला आली तेव्हा अखंड भारताची बहुसंख्य हिंदू आणि बहुसंख्य मुस्लीम या आधारावर भारत आणि पाकिस्तान अशी धर्माच्या आधारावर फाळणी करण्यात आली होती.
भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्याही एकमेकांपासून दूर अंतरांवर असलेले दोन वेगवेगळे भूखंड केवळ एक समान धर्म या आधारावर एक राष्ट्र म्हणून फार काळ राहू शकत नाही हे पूर्व पाकिस्तान हा प्रदेश पश्चिम पाकिस्तानपासून वेगळॆ झाल्याने सिद्ध झाले.
केवळ धर्म या समान धाग्याच्या आधारावर वेगवेगळया संस्कृतीचे लोक एक राष्ट्र म्हणून एकत्र नादुन शकत नाही हे यातून पुन्हा एकदा दिसून आले.
१९७१ बांगला देश युद्धाची १६ डिसेंबरला अखेर झाली होती तरी यासंदर्भात कितीतरी घटना वेगाने घडत होत्या.
त्यापैकी एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे पुर्व पाकिस्तानचे नेते शेख मुजिबर रेहमान यांची पाकिस्तानमधील तुरुंगातून सुटका आणि नव्यानेच जन्माला आलेल्या आपल्या बांगलादेश या राष्ट्रात जाण्याआधी भारतात नवी दिल्ली यांचे १० जानेवारी १९७२ रोजी झालेले आगमन.
शेख मुजिबर रेहमान यांना पाकिस्तानी कोर्टाने देहदंडाची शिक्षा सुनावली होती.
मात्र पाकिस्तानचा या युद्धात पराभव झाल्यानंतर लष्करशहा जनरल याह्या खान यांच्या तडकाफडकी राजिनाम्यानंतर पाकिस्तानचे सत्ताधारी म्हणून नव्यानेच सूत्रे घेणाऱ्या झुल्फिकार अली भुट्टो यांनी मृत्युदंडाची शिक्षा रद्द करुन मुजिबर रेहमान यांची सुटकाही केली.
(दुदैवाने पाकिस्तानचे पंतप्रधान झालेल्या याच भुट्टो यांना नंतर काही वर्षांनी पाकिस्तानात फाशी देण्यात आले होते! मला आठवते त्यावेळी अनेक राष्ट्रप्रमुखांनी भुट्टो यांना फाशी देऊ नये अशी विनंती केली होती पण पाकिस्तानने ती झुडकारली.)
पाकिस्तानातून सुटका होऊन शेख मुजिबर रेहमान दिल्लीत आले त्यादिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शेख मुजीबर रेहमान यांचे फोटो त्या दिवशी अनेक दैनिकांत पान एकवर ठळकपणे झळकले होते आणि त्या दोघांचे हसरे चेहेरे सर्व भारतीयांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करणारे असेच होते.
बांगला देशाप्रमाणेच भारताच्या इतिहासात हा एक महत्त्वाची घटना होती.
या घटनेचे शिल्पकार अर्थातच पंतप्रधान इंदिरा गांधी आणि लष्करप्रमुख जनरल (नंतर फिल्ड मार्शल) सॅम माणेकशा होते. भारताप्रमाणेच बांगलादेशात त्या दिवसांत अगदी जल्लोषाचे वातावरण होते.
यानंतर अनेक घटना घडत गेल्या, त्या युद्धाबरोबर येणाऱ्या घटनांचा परिपाक होत्या, काही अत्यंत गुंतांगुंतींच्या आणि संवेदनाशील होत्या.
पूर्व पाकिस्तानातील नेत्यांनी पश्चिम पाकिस्तानविरोधी लढा सुरु केल्यावर कराचीतल्या सत्ताधारी नेत्यांनी आणि लष्कराने पुर्व पाकिस्तानांत दडपशाही आणि अत्याचार सुरु केले होते त्यामुळे या देशातील पिडीत लोकांचा लोढा भारतात येऊ लागला. दररोज असंख्य लोक भारताच्या पूर्व सिमा ओलांडून या देशात आश्रय घेत होते.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या केंद्र सरकारने मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारुन निर्वासितांचा हा लोढा थोपवला नाही, मात्र दीर्घकालीन खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना भारतात इतरत्र फिरु न देता या निर्वासितांच्या स्वतंत्र छावण्या उभारल्या.
तेथे त्यांच्या तात्पुरत्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करण्यात आली होती. युद्ध तहकुबीनंतर आणि स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर या लाखो निर्वासितांची त्यांच्या मायदेशी रवानगी करण्यात आली.
तीच बाब युद्धकैद्यांची होती. या युद्धात एक लाखाच्या आसपास पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पुरेपूर पालन करत या लाखाच्या आसपास असलेल्या युद्धकैदी कैद्यांचा खर्च भारताने काही महिने सोसला आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्याशी काही महिन्यांनी झालेल्या सिमला करारानुसार या युद्धकैदयांची सुटका करुन त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले.
दुदैवाने शेख मुजिबर रेहमान यांना त्यांच्या देशातील जनतेचे प्रेम फार काळ लाभले नाही.
काही वर्षांतच मुजिबर यांच्याबाबत बांगला देशातील आणि भारतातील जनतेचाही भ्रमनिरास झाला. जनाधार गमावत चाललेल्या मुजिबर यांनी एकपक्षीय राजवट लागू करुन स्वतःकडे सर्व अधिकार एकवटून लोकशाही व्यवस्थेलाच सुरुंग लावला.
१५ ऑगस्ट १९७५ ला बांगलादेशातील काही लष्करी अधिकाऱ्यांनी उठाव करुन शेख मुजिबर रेहमान आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांची हत्या केली.
मात्र त्यांची एक मुलगी त्यावेळी देशाबाहेर असल्याने या हल्ल्यातून सुदैवाने वाचली. शेख मुजिबर रहमान यांची बचावलेली ही मुलगी शेख हसिना बांगलादेशच्या अनेक वर्षे पंतप्रधान राहिल्या
बांगलादेशच्या निर्मितीचा आनंद अनुभवलेल्या माझ्यासारख्या अनेकांना त्यानंतर केवळ चार वर्षांनी राष्ट्राध्यक्ष शेख मुजिबर रहमान यांची आणि कुटुंबियांची झालेली ही हत्या थरकाप उडवणारे आणि क्लेश देणारी होती.
बांगलादेशाने रक्तरंजित इतिहास आणि दीर्घकाळ लष्करी राजवट अनुभवली आहे. अनेकदा या देशातील राजवटीने भारताकडेही संशयी नजरेने पाहिले आहे.
बांगला देशाच्या दुसऱ्या एका रक्तरंजित लष्करी उठावात लष्करशहा झियाऊर रेहमान यांची हत्या झाली. झियाऊर रेहमान यांची पत्नी बेगम खलिदा झिया यांनी आणि शेख मुजिबर रहमान यांची कन्या शेख हसिना यांनी बांगलादेशचे पंतप्रधानपद आलटूनपालटून भूषवले आहे.
एका लोकशाहीप्रधान देशात गेल्या तीन दशकांच्या इतिहासात केवळ दोनच महिला पंतप्रधानपदी आणि प्रमुख राजकारणी असण्याचे जगातील हे एकमेव उदाहरण आहे.
भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांचे तर दोन वेगवेगळे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि ‘अमार सोनार बांगला’ रचणारे कवि एकच व्यक्ती नोबेल पारितोषक विजेते महाकवी रविंद्रनाथ टागोर हे आहेत.
समान संस्कृती, भाषा, पेहराव आणि इतिहास भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांत आहे.
दुदैवाने शेख हसीना आपल्या वडलांच्या पावलावर पाऊल ठेवत हुकुमशहा बनल्या. गेली काही वर्षे या देशात लोकशाही नावालाच होती. त्याची परिणीती आज त्यांच्या राजीनाम्यात आणि देशाबाहेर पलायन करण्यात झाली आहे.
- कॅमिल पारखे, लेखक जेष्ठ पत्रकार असून महाराष्ट्र तसेच गोवा राज्यात - द नवहिदं टाईम्स, इंडीयन एक्सप्रेस, टाईम्स ऑफ इंडीया, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ आदि सारख्या वर्तमान पत्रात दिग्गज पत्रकार म्हणून ते दीर्घ काळ गाजवत आहेत.