कॉंग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातासह अनेक नेते मुख्यमंत्री पदासाठी बाशिंग बांधून तयार
◻️ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
◻️ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक शरद पवार करणार नाहीत
संगमनेर LIVE | मुख्यमंत्री होता यावे यासाठी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीची साथ सोडू शकतात. तर ते आपल्या पाठीत केव्हाही पाठीत खंजीर खुपसू शकतात हे शरद पवारांना माहिती आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची कधीही चूक करणार नाहीत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस व शरद पवार गटाच्या जाळ्यात फसले आहेत. त्यांना मुख्यमंत्री करणे हा केवळ एक खेळ होता. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदासाठी डोक्याला बाशिंग बांधून आहेत, कॉंग्रेसचे इतरही नेते इच्छुक आहेत. सोबतच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा मनसुबा शरद पवारांचा आहे. यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी याचना करीत आहेत. महाविकास आघाडीत प्रचंड असंतोष पसरला आहे. अमित शहा यांच्या नावावर जसा खोटारडेपणा उद्धव ठाकरेंनी केला तसाच खोटारडेपणा ते शरद पवारांच्या नावाने करतील. मुख्यमंत्री पद मिळविण्याकरिता उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते, पण त्यांना तेथून फेटाळून लावले.
जागावाटपाबाबत चर्चा व्हावी महायुतीमधील तिन्ही नेत्यांनी एकत्र येत आगामी सात दिवसात जागावाटपाबाबत चर्चा पूर्ण करावी, अशी मागणी भाजपाची असल्याचे बावनकुळे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी फार काळ उरलेला नाही. तिन्ही पक्ष महायुतीमध्ये लढणार असून इतर अकरा घटक पक्षांचाही विचार व्हावा. सिटिंग गेटिंगचा विचार सुरू आहे, तथापि, कोणत्याही सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. सिटिंग गेटिंग मध्येही काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली. प्राथमिक स्तरावर स्थानिक स्तरावरच निर्णय होतात अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्त्व घेईल.
शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यामागे त्यांची सुरक्षा हाच हेतू असल्याचे बावनकुळे म्हणाले आहे. राज ठाकरे राज्याचे नेते आहेत, त्यांचे बॅनर लागले तर त्यात चूक काय? तसेच गरिबांच्या कल्याणाकरिता महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारची गरज आहे.
महाआघाडीचे सरकार राज्यात आल्यास केंद्र सरकारच्या सर्व योजना बंद होतील. महायुतीमध्ये कागलची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटणार आहे. समरजीत घाडगे यांना लढायचेच असेल तर त्यांना कोण थांबविणार असेही पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले.