अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य!
◻️ किसान सभेकडून कंगणाच्या बेताल शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध
संगमनेर LIVE | संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते व या आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचे षड्यंत्र होते अशा प्रकारचे अत्यंत बेताल वक्तव्य अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत हिने केले आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ६०० पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान झाला असल्याची टिका किसान सभेनी केली आहे.
कंगना राणावत हिने यापूर्वी सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दल अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केली आहेत. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सुद्धा अशाच प्रकारची बेताल वक्तव्य यापूर्वी त्यांच्याकडून करण्यात आली आहेत.
कंगना राणावत करत असलेली वक्तव्य या देशातील स्वातंत्र्य युद्ध आणि या देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी दिली.