आश्वीच्या अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना पत्र लिहून सांगितली वस्तूस्थिती
संगमनेर LIVE | आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा असून संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेसह भौगोलिक रचनेला यामुळे धक्का लागणार आहे. त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होणार असल्याने हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित असून यामध्ये संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द, समनापुर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे शहरालगतची गावे ही दूर असलेल्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने नागरिकांनमध्ये नाराजी आहे. याबाबत विविध गावांमधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री थोरात यांची भेट घेऊन या कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करावा यासाठी मागणी केली. यानंतर थोरात यांनी तालुक्याची मोडतोड होऊ देणार नाही असा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे.
तसेच माजी मंत्री थोरात यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या चुकीच्या प्रस्तावा बाबत पत्र लिहिले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी संगमनेर यांनी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्ताव हा अत्यंत चुकीचा आहे. तो वस्तुस्थितीला धरून नाही. या प्रस्तावामुळे जनतेची सोय होण्यापेक्षा गैरसोय अधिक होणार आहे. असे दिसते संगमनेर शहरालगाच्या गावांना देखील या प्रस्तावानुसार आश्वी बुद्रुक या प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालया जोडले आहे. भौगोलिक परिस्थिती, महसुली मंडळाची सोय अशा कोणत्याच बाबींचा या प्रस्ताव तयार करताना विचार केलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे यातील अनेक गावांना प्रास्तावित आश्वी येथील कार्यालयात जाण्यासाठी संगमनेर वरूनच जावे लागते आहे. ही बाब अत्यंत गंभीर व प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची आहे.
या प्रस्तावामुळे तालुक्याच्या एकता आणि अखंडतेला धक्का लागला आहे. तरी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी आपल्या स्तरावरून या गंभीर बाबीची दखल घेऊन महसूल विभागाने काढलेला हा चुकीचा प्रस्ताव रद्द करून तातडीने फेरविचार करण्याची विनंती केली आहे.
महसूल प्रशासनातील ताण कमी करत असताना जनतेची गैरसोय होणार नाही. याची दक्षता घ्यावी. तसेच संगमनेर तालुक्याची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक परंपरेला तसेच भौगोलिक रचनेला धक्का लागणार नाही. याबाबत ही तातडीने नवा प्रस्ताव करण्याच्या सूचना द्याव्या अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान या पत्रानंतर मुख्यमंत्री कार्यालय व महसूलमंत्री कार्यालय यांच्याकडून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी माहिती कळविली आहे.