“मटण झटका असो वा हलाल आपल्याला खायला मिळालं पाहिजे!”
◻️ केद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मंत्री राणेंना सुनावले
संगमनेर LIVE (मुंबई) | मंत्री नितेश राणे यांनी मटणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेचा अनेकांनी विरोध केला आहे. राणे यांच्या भूमिकेशी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनीही असहमती दर्शवली आहे. मटणाच्या मुद्यावर ना. रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत सुनावले आहे. “मटण झटका असो वा हलाल आपल्याला खायला मिळालं पाहिजे” अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मांडली.
नितेश राणे यांनी झटका सर्टिफिकेट असलेले मटण विक्रीचा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिले. मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. नितेश राणे एवढी हार्ड भूमिका घेऊ नका. असे ना. आठवले म्हणाले आहेत.
ते म्हणाले, मुसलमान आता हा देश सोडून जाऊ शकत नाहीत. सर्वधर्मसमभावाचे देशात संविधान निर्माण झाले आहे. त्याचा विचार करता मी नितेश राणे यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले. तर, राजकीय फटकेबाजी देखील केली.
प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर भाष्य करताना आठवले म्हणाले की, ‘प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना लोकांनी जास्त वाचू नये. जास्त वाचले की डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे वाद निर्माण होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील टीका ही चुकीची आणि मूर्खपणाची आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते, या नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना रामदास आठवले म्हणाले, ‘नितेश राणे यांचं म्हणणं अत्यंत चुकीचे आहे. त्यावेळी नितेश राणे ही नव्हते आणि मीही नव्हतो. इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख मुस्लीम होते, असे पुरावे पुढे आलेले आहेत. अनेक शूर मुस्लीम हे मुघलांच्या विरोधात लढलेले आहेत आणि हाच इतिहास असल्याचे आठवले यांनी राणेंना आपल्या शैलीत सुनावले.