आमदार सत्यजीत तांबे यांचाचं शास्तीकर माफीसाठी सरकारकडे पाठपुरावा
◻️ अपघाताने झालेल्या लोकप्रतिनिधीकडून अपूर्ण माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल
◻️ शास्तीचा निर्णय हि पूर्णपणे धुळफेक? असल्याची नितीन अभंग यांची टिका
संगमनेर LIVE | राज्यातील नगरपरिषद हद्दीमधील मालमत्ता धारक नागरिकांनी घरपट्टी वेळेत न भरल्यास त्यावर २ टक्के शास्ती कर व अनाधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफ करावा यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. मात्र, नवीन लोकप्रतिनिधी हे शास्ती कराबाबतच्या अपूर्ण माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी केली.
नितीन अभंग यांनी दिलेल्या प्रसिद्धी प्रत्येक म्हटले आहे की, संगमनेर नगर परिषदेकडून शहरातील सर्व शास्ती कर माफ करण्यात यावा यासाठी सभागृहात वेळोवेळी ठराव केले आहे. हे ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले आहेत. तसेच अनाधिकृत बांधकामावरील शास्ती व २ टक्के शास्तीकर माफ व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला. त्याचबरोबर विधान परिषदेचे आवाज देखील उठवला होता.
नगरपरिषद हद्दीमधील मालमत्ताधारक नागरिकांनी दरवर्षी घरपट्टी न भरल्यास त्यांच्यावर २ टक्के शास्ती कर आकारण्यात येतो. नव्या आलेल्या शासन निर्णयानुसार २ टक्के शास्तीकरातील ५० टक्के रक्कम माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना दिला आहे. तसेच १०० टक्के शास्ती माफ करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव शासनास सादर करावा, असे या शासन निर्णयात म्हटलेले आहे.
परंतु अनाधिकृत बांधकामातील शास्ती कर हा कोणत्याही प्रमाणात कमी केलेला नाही. तो तसाच प्रलंबित ठेवण्यात आला आहे. परंतु, हा शास्तीचा निर्णय अपूर्ण असून या अपूर्ण माहितीच्या आधारे स्थानिक नवीन लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत.
संगमनेर नगरपरिषदेने कायम नागरिकांना सर्वोच्च सुविधा देण्यास प्राधान्य दिले आहे. मात्र मागील साडेतीन वर्षापासून नगरपालिकेमध्ये प्रशासन असून महायुतीच्या प्रभावाखाली हे प्रशासन काम करत आहे. यामुळे शहरातील अनेक मालमत्ता धारकांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
संपूर्ण शास्ती कर माफ व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे शासनाने हा अध्यादेश काढला असून यामध्ये काही निर्णय घेण्यात आले आहे. तर, उर्वरित निर्णय घेण्यासाठी सुद्धा आमदार सत्यजीत तांबे हे प्रयत्नशील असून संगमनेर मध्ये अपघाताने झालेले लोकप्रतिनिधी हे चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप नितीन अभंग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.