वादळी पावसामुळे निळवंडे येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले

संगमनेर Live
0
वादळी पावसामुळे निळवंडे येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले

◻️ आमदार अमोल खताळ यांनी केली घटनास्थळाची पाहणी

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे सोमवारी सायंकाळी वादळी पाऊस कोसळला. या वादळात निळवंडे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्रे उडून अनेक नागरिकांच्या घरावर जाऊन पडले. त्यामुळे शाळा खोल्यांबरोबरच गावातील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ निळवंडे येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. विद्यार्थ्याच्या बसण्याची व्यवस्था तात्काळ करावी असे निर्देश त्यांनी तात्काळ गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.

संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने कांदा डाळिंब, भाजीपाला आणि चारा पिकांना फटका बसल्याचे समोर आले आहे. 

शहर आणि तालुक्यात या वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजवाहक तारांवर पडली. त्यामुळे वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला होता. मात्र महावितरणच्या  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर शर्तीचे प्रयत्न करून शहरातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे. ग्रामीण भागातील सुद्धा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. या संपूर्ण परिस्थितीची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत केली आणि कुणीही पंचनामे पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

आमदार खताळ यांच्या समवेत  प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, गटशिक्षण आधिकारी बाळासाहेब गुंड, नायब तहसीलदार राजेश पऊळ, निळवंडे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. शशिकला पवार, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी आहेर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय आहेर, कामगार तलाठी वर्षा महाले, ग्रामसेविका कविता आंबरे, कृषी सहाय्यक अपर्णा गडाख व शाळेचे मुख्याध्यापक रमेश निघुते यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील निळवंडे येथे वादळ वाऱ्याने अनिल जिजाबापू आहेर, सुधीर गोरख पवार, चंद्रभान रामभाऊ पवार, शकुंतला त्र्यंबक आव्हाड, सुनील बाळकृष्ण उकिरडे, गोरख पंढरीनाथ वाकचौरे, शिवाजीबाबा आहेर, भाऊसाहेब महादू वारे यांच्या घरांचे तसेच सुभाष शिवनाथ पवार यांची डाळिंब बाग आणि दारकू दामू गायकवाड, साहेबराव कुशाबा गायकवाड यांच्या घरकुलाचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नुकसानग्रस्तांसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा..

अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आपण निर्देश दिले आहेत. त्यानुसार युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. याची काळजी घ्यावी. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !