स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा देशासाठी त्याग तरुण पिढीला सदैव प्रेरणादायी
◻️ स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ यांचे अभिवादन
◻️ नगरपालिका प्रशासनाकडून पहिल्यांदाच परिसरात रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई
संगमनेर LIVE | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची राष्ट्रभक्ती व हिंदुत्वासाठीचा त्याग आजच्या तरुण पिढीला सदैव प्रेरणा देणारा असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरातील स्वातंत्र्यवीर चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, कार्यालय निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सुभाष कोथमीरे, बाळकृष्ण महाजन, राजाभाऊ देशपांडे, चंद्रशेखर ठुसे, रामभाऊ राहाणे, ज्ञानेश्वर कर्पे, विनोद सूर्यवंशी, कैलास वाकचौरे, अविनाश थोरात, प्रवीण कर्पे, पायल ताजणे, दिपाली वाव्हळ, कमलाकर भालेकर आदी उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले, हिंदू समाज एकत्र आला तर इतिहास घडतो आणि शत्रूंचा इतिहास मिटतो, हा सावरकरांचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे. त्यांच्या राष्ट्रसेवेचा आणि बलिदानाचा आपण सर्वांनी आदर ठेवावा. अंदमानच्या कारागृहात ५० वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या सावकार यांच्या बाबत काही काळ अपप्रचार झाला होता.
राष्ट्रप्रेमी व हिंदुत्वनिष्ठ लोकांच्या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना पुन्हा उजाळा मिळतो आहे, ही समाधानकारक गोष्ट असल्याचे आ. खताळ यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथमीरे, रत्नाकर महाजन व चंद्रशेखर खुशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्मारकाची रंगरंगोटी व विद्युतरोषणाई पाहून समाधान..
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची नगर पालिका प्रशासनाने रंगरंगोटी करून प्रथमच आकर्षक विद्युत रोषणाई केली हे फक्त सौंदर्यवर्धन नाही, तर आपल्या इतिहासप्रेमाचे व राष्ट्रभक्तीचे प्रतीकही आहे. या सर्व स्मारकाची रंगरंगोटी आणि स्वच्छता पाहून सर्व सावरकर प्रेमींच्या मनाला समाधान वाटत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी यावेळी म्हटले.