शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्याधिकाऱ्यांना कॉग्रेस शिष्टमंडळाचे निवेदन
◻️ संगमनेर शहरातील समस्या सोडवून नागरीकांच्या मागण्या १५ दिवसात पूर्ण करण्याचा दिला अल्टिमेटम
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र मागील तीन वर्षापासून संगमनेर नगरपरिषदेवर प्रशासक असल्यामुळे विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शहरात समस्याचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यापूर्वी शहरातील नाटकीनाला सह उपनद्या साफ कराव्यात, भुयारी गटारी योजनेचे काम तातडीने मार्गी लावावे, शहरातील उद्याने साफ करावीत व तेथे चालणारे अवैध धंदे व गैरवापर करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, ज्या स्ट्रीट लाईट बंद असतील त्या तातडीने चालू कराव्यात, विजेच्या तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या व वाढीव झाडांची कटिंग करावी.
ज्या कामांच्या निविदा निघून वर्क ऑर्डर दिलेले आहेत ती कामे त्वरित चालू करावी, मोडकळीस आलेल्या इमारतींना पूर्व सूचना देऊन त्या काढून घ्याव्यात, म्हाळुंगी नदीच्या पुलाला पावसाळ्या अगोदर कठडे बसवावी, शहरातील मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शहरातील सुलभ शौचालय युरिनल स्वच्छता करावी, शहरात आणि रस्त्यांना खड्डे पडले असून ते तातडीने बुजवावे.
ज्या कामांची प्रशासकीय मान्यता झाली आहे. त्या कामांची निविदा काढावी, अपूर्ण असलेली कामे परिपूर्ण करावी, जुन्या गावठाणात वापरात नसलेले लाईट पोल काढून घ्यावेत व पावसाळ्यापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्या अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. नगरपालिका प्रशासनाने पुढील पंधरा दिवसात या मागण्या पूर्ण कराव्यात, तातडीने कार्यवाही करावी. असे न झाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
अपंगांच्या निधी प्रलंबित आहे व अपंगांची संख्या वाढत चालली असून तो प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संगमनेर शहरात आपण सुंदर ४० गार्डन निर्माण केले आहेत. मात्र त्याची आता दुरावस्था झाली आहे. गार्डन मधील लहान मुलांचे खेळण्याची साहित्य मोडकळीस आले आहे. संगमनेर शहराची स्वच्छता आणि सौंदर्य बिघडवण्याचे काम सुरू आहे ते थांबवले पाहिजे. असे सौ. दुर्गाताई तांबे यांनी म्हटले.