मी पणा दूर ठेवून श्रीनिवासजी यांनी भक्तीचा मार्ग सुरू केला - भैय्याजी जोशी

संगमनेर Live
0
मी पणा दूर ठेवून श्रीनिवासजी यांनी भक्तीचा मार्ग सुरू केला - भैय्याजी जोशी

◻️ श्रीनिवासजी यांचे कार्य कल्पनाशक्तीच्या पलिकडचे - पालकमंत्री विखे पाटील 

◻️ शिर्डी येथे द्वारकामाई वृध्दाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास बी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण



संगमनेर LIVE (शिर्डी) | निस्वार्थ आणि समर्पण भावनेतून श्रीनिवासजी यांनी उभारलेला वृध्दाश्रमाचा प्रकल्प साईबाबांच्या श्रध्दा आणि सबुरीच्या मंत्राशी जोडला गेला आहे. मी पणा दूर ठेवून त्यांनी उभ्या केलेल्या कामातून ईश्वरी भक्तीचा मार्ग दिसत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.

द्वारकामाई वृध्दाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास बी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून वृध्दाश्रमात त्यांच्या कुटूबियांनी उभारलेल्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक नानासाहेब जाधव, विश्व हिंदू परिषदेचे दादाजी वेदक, स्वामी अहोवीला रामानूज, सौ. स्नेहलता कोल्हे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, नागभूषण रामकृष्णाजी संस्थेचे अध्यक्ष राममोहन, संचालिका सुधा श्रीनिवास, मुलगा शिवस्मरण, मुलगी किर्तना आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात भैय्याजी जोशी म्हणाले की, द्वारकामाई हा वृध्दाश्रम नसून एक प्रकारचे घर आहे. यामध्ये त्यांना आजी आजोबा पाहायला मिळाले. एका मुलाप्रमाणे त्यांनी केलेल्या  सेवेचे कार्यात कुठेही मी पणाचा भाव दिसला नाही. हे माझे नाही असे समजूनच त्यांनी या कार्यात स्वताला झोकून दिले. यातून त्यांना ईश्वरभक्तीच दिसली.

साईबाबांनी सबका मालिक एक हा मंत्र दिलाच पण यापेक्षाही श्रीनिवास यांनी श्रध्देतून सेवा कार्य केले आणि कार्य करताना सबुरी सुध्दा ठेवल्याचे सांगून त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी त्याच निस्वार्थ भावनेने हे कार्य पुढे नेत असल्याचे समाधान  जोशी यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, श्रीनिवासजी यांचे कार्य कल्पनाशक्तीच्या पलिकडचे आहे. निराधाराचा ते आधार बनले. या वृध्दाश्रमाकडे पाहील्यावर एक परीवार निर्माण झाल्याचे दिसते. कोण कुठुन आला हे माहीत नसलेल्या व्यक्ति आनंदाने राहून आपले आयुष्यमान वाढवत आहेत. साईबाबांनीच हे कार्य त्यांच्याकडून करवून घेतले.

वृध्दाश्रम संस्कृती का आली याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली संस्कृती एकत्र कुटूंब पध्दतीची आहे. मात्र आज परीवार छोटे झाले आणि समस्या मोठ्या झाल्या आहेत. छोट्या कुंटूबात मायेचा प्रेमाचा ओलावा कमी झाल्याची खंत व्यक्त करून जन्म दात्या आईवडीलांना सांभाळू शकत नाही हे पाहून मन व्यतिथ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !