शरीर स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने योगासने करणे गरजेचे - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर येथे पतंजली समितीच्या वतीने योग दिन उत्साहात
संगमनेर LIVE | योगासनांच्या माध्यमातून शरीराला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळत असते. मन शांत ठेवण्यासाठी योगासनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने शरीर स्वास्थ्यासाठी योगासने करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ पाटील यांनी केले.
संगमनेर येथे पतंजली योग समितीच्या वतीने आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते. पतंजली योग समितीचे अध्यक्ष विजय देशमुख, सचिव रमेश बांगर, सदस्य सुभाष कुटे, कैलास कानवडे, अशोक जाधव, विकास पुंड, अनिता देशमुख, निवृत्ती शिर्के, कार्तिक पुंड आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व ओळखून दरवर्षी २१ जूनला संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे जाहीर केले, तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा होत आहे. काही जण योग दिन फक्त एका दिवसासाठी साजरा करतात, परंतु पतंजली योग समितीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र येऊन योगासने करतात ही आनंदाची गोष्ट आहे. योगा बद्दल अनेक समज गैरसमज होते. मात्र पतंजली योग समितीच्या माध्यमातून ते सर्व दूर करण्यात आले आहे. गणेश नगरमध्ये योग भवन बांधण्यात आले आहे. त्याचाही योग साधकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खताळ यांनी यावेळी केले.
संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले, योग ही एक भारताने जगाला दिलेली एक मोठी देन आहे. योगाच्या माध्यमातून आपलं शरीर, मन तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न असतो. कितीही धावपळ असली तरी प्रत्येकाने सूर्य नमस्कार प्राणायाम केले तर आपलं आरोग्य हे उत्तम राहते, याचा अनेक जणांनी अनुभव घेतला आहे. धकाधकीच्या जीवनात शरीर स्वास्थ्यासाठी योगा करणे काळाची गरज आहे. काही ठिकाणी योगदिन फक्त एका दिवसासाठी साजरा केला जातो. मात्र,पतंजली योग समितीच्या स्थायी वर्गाच्या माध्यमातून अनेक जण एकत्र येऊन दररोज नित्यनेमाने योग करतात. ही एक अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.