◻️ मोरवाडी धरणा बाबत बुधवारी मंत्रालयात बैठक - आमदार अमोल खताळ
संगमनेर LIVE | यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील पठार भागातील जनतेला गेली ४० वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवले. या भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्यासाठी मोरवाडी येथे धरण व्हावे अशी साकुर पठार भागातील जनतेची अनेक वर्षाची मागणी होती. या मागणीची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली असून पुढील आठवड्यात बुधवारी मुंबई येथील मंत्रालयामध्ये मंत्री विखे यांच्या प्रमुख उपस्थिती मोरवाडी धरणाच्या संदर्भात जलसंपदा विभागाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील दत्त मंदिरात येथील युवक कार्यकर्ते दत्तात्रेय वर्पे, राज पाटोळे आणि वरवंडी ग्रामस्थांच्यावतीने आमदार खताळ यांची पेढेतुला करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना खताळ यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणालेकी, तालुक्यातील साकूर पठारभागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी मुळा नदीवर मोरवाडी धरण व्हावे. अशी या भागातील जनतेची अनेक वर्षांची जुनी मागणी आहे. हे धरण होण्यासाठी जागाही संपादित करण्यात आली होती. मात्र नंतर हे ठिकाण मागे पडून याच नदीवर पुढे राहुरी तालुक्यातील मुळा धरण बांधण्यात आले.
सध्या मुळा नदीवर आंबीत व पिंपळगाव खांड ही दोन धरणे आहेत. त्यापैकी पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये साकूर पठारभागातील गावांचा समावेश नसल्याने ही गावे अनेक वर्ष पाण्यापासून वंचित राहिली आहेत. तसेच या धरणाच्या लाभ क्षेत्रात या पठार भागाचा समावेश व्हावा यासाठी अकोले तालुक्यातील अनेक गावांचा विरोध आहे. त्यामुळे पठार भागासाठी मोरवाडी हे स्वतंत्र धरण व्हावे अशी या भागातील नागरिकांची इच्छा आहे.
त्यानुसार जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाचा सर्वे करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार सर्वे झाला आहे. तसेच पुढील आठवड्यात बुधवारी या मोरवाडी धरणाच्या संदर्भात मुंबईला मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी रामभाऊ राहणे, गुलाब भोसले, रऊफ शेख, रवींद्र दातीर, बाबासाहेब कुटे, बाबाजी सागर, अमित धुळगंड, दादाभाऊ गुंजाळ, आशिष शेळके, ऋषीराज बाबा परांडेकर, विद्याताई महाराज बानकर, पुरुषोत्तम महाराज पेटकर, गणेश डोंगरे, भागवत बस्ते, डॉ. संतोष वर्पे, बाजीराव पाटोळे, राजाबापू वर्पे, उल्हास गागरे, एकनाथ वर्पे, संपत भोसले, तुळशीराम पाटोळे, सुभाष पाटोळे यांच्यासह साकुर पठार भागातील मान्यवर व वरवंडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी अनेकांनी तुमच्यावर दहशत दादागिरी करून तुम्हाला सोशल मिडियाच्या माध्यमातून धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करा. परंतु ते आती करत असतील तर, मला सांगा. मी त्यांचा नक्कीच बंदोबस्त करेल. माझ्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे. असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी यावेळी दिला.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथे दत्त महाराजांच्या मंदिराचा सर्वागीण विकास करण्यासाठी तुम्ही प्रस्ताव द्या, हे मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात घेण्यासाठी आपण शासन पातळीवर प्रयत्न करू. तुम्ही माझ्याकडे सभामंडपाची मागणी केली आहे. त्यामुळे आमदार निधीतून सभा मंडपासाठी दहा लाख रुपये जाहीर करत आहे. हा सभा मंडप कुठे घ्यायचा आहे हे तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्रित बसून ठरवावे. असे आवाहन आमदार खताळ यांनी केले.