उंबरी बाळापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५ मेंढ्याचा मृत्यू तर, ७ ते ८ मेंढ्या गंभीर जखमी
◻️ २० गावरान कोंबड्यांचा देखील बिबट्याने पाडला फडशा
◻️ शेतकऱ्यांचे दोन ते अडीच लाखांचे अर्थिक नुकसान
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने पशुधनावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ५ मेंढ्याचां मृत्यू झाला असून ७ ते ८ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच बिबट्याने याठिकाणी असलेल्या १५ ते २० कोंबड्यांचा देखील फडशा पाडल्यामुळे शेतकऱ्यांचे दोन ते अडीच लाखांचे अर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, उंबरी बाळापूर शिवारातील लेंडी पुलाजवळ असलेल्या दत्तनगर येथे खंडू कारभारी होडगर यांची गट नबंर ४७६ मध्ये शेती आणि मेंढ्या व कोंबड्यांसाठी बांधलेले शेड (गोठा) आहे. यामध्ये ४५ मेंढ्या आणि २५ ते ३० गावरान कोंबड्या होत्या. गुरुवारी कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्यामुळे संदीप होडगर हा नेहमीप्रमाणे गोठ्यात झोपण्यासाठी जाऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळी संदीप जेव्हा गोठ्यात मेंढ्याना चारापाणी करण्यासाठी गेला असता त्याठिकाणी ४ ते ५ मेंढ्या रक्ताच्या थारोळ्यात मृत पडलेल्या दिसल्या, लहान कोकराचा देखील समावेश आहे. तर, ७ ते ८ मेंढ्या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.
त्यामुळे संदीपने या दुर्दैवी घटनेची माहिती कुटुंबातील इतर सदस्यांना कळवल्यानंतर सुरेश होडगर यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपाल रमेश पवार, वनरक्षक एस. बी. सोनवणे, वनमजूर बाळासाहेब डेंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या मृत मेंढ्याचा कागदोपत्री पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी रासपचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र खेमनर (जानकर), संदीप होडगर, सुरेश होडगर, लक्ष्मण जुधारें, बापू कुदनर, राहुल जुधारें, नानासाहेब होडगर, रवींद्र खेमनर, सोमनाथ शिंदे, बापू निर्मळ, विलास निर्मळ, संदीप भुसाळ, बाळासाहेब शिंदे, संतोष शिंदे, अमोल शिदे, संपत निर्मळ, अशोक घोलप, सुरेश भुसाळ, भागवत उंबरकर, सुभाष भुसाळ, किरण भुसाळ, भिकाजी खेमनर यांनी परिसरात बिबट्यासह रानडुक्कराची देखील दहशत असल्याची माहिती दिली. तसेच याठिकाणी वनविभागाने पिंजरा लावुन हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी केली.
दरम्यान घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यामुळे परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तर, ९ ते १० महिन्यांपूर्वी संदीप होडगर या तरुणाने कर्ज काढून या मेंढ्या खरेदी केल्या होत्या. ही घटना घडल्यामुळे त्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून वनविभागाने जास्तीत जास्त भरपाई या तरुणाला द्यावी. अशी मागणी देखील उपस्थित शेतकऱ्यानी याप्रसंगी केली आहे.