महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वबळावर उभे राहावे - सौ. शालिनीताई विखे
◻️ पेमगिरीच्या महाकाय वटवृक्षाची सौ. विखे, सौ. खताळ यांच्यासह शेकडो महिलांनी केली पुजा
◻️ तालुक्यातील कर्तृत्ववान आणि कर्तबगार महिलांचा केला गौरव
संगमनेर LIVE | प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. त्या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे, तसेच आलेल्या प्रत्येक संधीच सोनं करावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वबळावर उभे राहावे. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक अशा पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात सौ. विखे बोलत होत्या. जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीने खास महिलांसाठी ‘उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा’ या महिलांसाठी च्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ, पंचायत समिती माजी सदस्य सुनिता कानवडे, वर्षा डुबे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
सौ. विखे पुढे म्हणाल्या की, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत रूढ होती. त्यामुळे आई - वडिलां कडून मुलांना योग्य संस्कार मिळत होते, मात्र आता विभक्त कुटुंबपद्धत झाल्यामुळे संस्कार मिळणे कठीण झाले आहे. महिलांनी एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींना सहकार्य करावे. विधवा महिलेला समाजबाह्य न करता तिला मान-सन्मान द्यावा, असंही त्यांनी सांगितले. पती गेला तरी महिला कुंकू लावू शकते, कारण तीही समाजाचा भाग आहे. मुलगाच वंशाचा दिवा नाही, मुलगी सुद्धा पणती आहे अन ती कायम प्रकाश देत असल्याचे विखे यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ यांच्यासह उपस्थित महिलांनी महाकाय वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलानी वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली. यावेळी त्यांनी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त प्रत्येक महिलेला वडाचं रोप भेट दऊन या वटवृक्षाचे सर्व महिलांनी संवर्धन करावे. असे आाहन सौ. शालिनीताई विखे यांनी केले.
महिलांच्या दृष्टीने वट पौर्णिमा हा सण महत्वाचा आहे. वड वाढत गेला तसेच या तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींनी एकत्रित येऊन परिवर्तन केले. त्यामुळे तुमच्या पाठीमागे मी व तुमचे भाऊ भक्कम उभे राहतील. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी व्यक्त केला.
वैष्णवी उपरे, नीलम कासार, वर्षा दीक्षित, सविता कासार, मनोली नवले या सैनिक पत्नींचा तसेच बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलाला वाचवणाऱ्या कविता खताळ यांचा वट वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. तर, महिला पोलीस अनिता गुंजाळ, मीरा बिबवे, सविता सोळशे, शशीकला हांडे, शिला साबळे, सुवर्णा नवले, लता जाधव, सुषमा भांगरे, सविता रुपवते, प्रतिभा थोरात, लता जाधव, निशा धाडी, सुवर्णा नवले, माधुरी मुंडलिक यांचा देखील वडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.