यूरिया खतापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ यूरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषि सेवा केंद्रासह सहकारी संस्थावर कारवाई करण्याचे निर्देश
संगमनेर LIVE | खरीप हंगामासाठी सरकारने संगमनेर तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर यूरिया खताचा पुरवठा केला आहे. मात्र, काही ठिकाणी यूरिया मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील शेतकरी यूरिया खतापासून वंचित राहणार नाही याची दक्षता कृषि अधिकाऱ्यांनी घ्यावी. असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले आहेत.
तालुक्यात यूरिया खताचा पुरेसा पुरवठा असतानाही शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असल्याने या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी कृषि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सर्व कृषि सेवा केंद्र सहकारी संस्था यांचा समन्वय साधून यूरियाचा साठा निश्चित करा. शेतकऱ्यांना तांत्रिक कारणाने युरिया खत मिळण्यास काही अडचणी येत असतील तर, त्यावर तात्काळ उपाय योजना करावी आणि शेतकऱ्यांना यूरिया खत उपलब्ध करून द्यावी. कृषि सेवा केंद्र चालक अगर सहकारी संस्था युरिया असतानाही कृत्रिम टंचाई निर्माण करत असेल तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. असे निर्देश आ. खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाला ४११ मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाली आहे. त्यातील २०५ मेट्रिक टन युरिया खताचे वितरण पूर्ण झाले आहे. संपूर्ण तालुक्यातील विविध कृषि सेवा केंद्रे आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संगमनेर तालुक्यात काही ठिकाणी युरिया टंचाई असल्याच्या विनाकारण अफवा पसरविल्या जात आहेत. मागणी नुसार पुरवठा होत असून शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कुठे अडवणूक होत असल्यास जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांना केले.