राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती - शिवगिरी महाराज
◻️ धांदरफळ येथील रामेश्वरच्या पावनभूमीतील शिवपुराण कथेची भक्तिमय वातावरणात सांगता
संगमनेर LIVE | धर्माच्या कार्यासाठी आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली तर खरी क्रांती घडते. अशीच क्रांती आयोध्येतील राम मंदिर बांधून रामराज्य आले असल्याचे गौरवोद्गार त्रंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर १००८ स्वामी शिवगिरी महाराज यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्यावतीने गेली सात दिवसापासून सुरू असलेल्या शिव पुराण कथेची भक्तिमय वातावरणामध्ये सांगता झाली त्यावेळी भाविक भक्तांना उपदेश करताना१००८ शिवगिरी महाराज बोलत होते.
यावेळी कोपरगाव येथील जनार्धन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, नारायणपूर येथील अण्णा महाराज यांचे उत्तर अधिकारी टेंबे स्वामी महाराज, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हरीओम वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख अविनाश वाकचौरे आदी उपस्थित होते.
शिवगिरी महाराज म्हणाले की, हिंदू धर्मियांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घेत हिंदू धर्माची मशाल प्रत्येकाने आपल्या अंतकरणात पेटवून ठेवली पाहिजे. धर्मकार्यामध्ये प्रत्येकाने या शिवपुराण महाकथेचे श्रवण करून आचरणात आणणे गरजेचे आहे. हे धार्मिक कार्याचे व्यासपीठ आहे आणि त्याचे पावित्र्य प्रत्येकाने राखले पाहिजे. तुम्हा सर्वावर भगवंताची कृपा अखंड अशीच राहावी आणि यांच्या हातून तुमच्या हातून या हिंदू धर्माचे कार्य असेच होत राहो. साधूसंतांचे आपल्यावर खूप मोठे संस्कार केले आहे. ते संस्कार प्रत्येकाने जोपासणे गरजेचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, पुढील वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्याचा उल्लेख करत, तो प्रयाग राज कुंभापेक्षाही भव्य होणार असल्याची अपेक्षा शिवगिरी महाराज यांनी व्यक्त केली.
यावेळी टेंबे स्वामी महाराजांची संगमनेर ते धांदरफळ मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले. तसेच संपूर्ण गावातून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तसेच रामेश्वर मंदिरात त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. ही शिवपुराण कथा यशस्वी करण्यासाठी हरी ओम वृक्षमित्र परिवाराच्या सर्व भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.
महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. या साधू संतांनी कायमच धर्माविषयी प्रचार प्रसार केला आहे. मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे. या गावामध्ये धर्मासाठी एवढा मोठा कार्यक्रम झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमातून खऱ्याअर्थाने प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. धर्माचे काम असेल त्या ठिकाणी मी कधीच कमी पडणार नाही. हिंदू धर्मासाठी मी तुमच्या मागे कायमस्वरूपी भक्कम उभा राहील आणि या रामेश्वर परिसराच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भरीव निधी दिला आहे. येथून पुढील काळातही महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव निधी दिला जाईल. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
प्रत्येकाने माणसाच्या जन्माला ओळखून कशाप्रकारे राहिले पाहिजे आणि कशा प्रकारे? वागले पाहिजे हे ठरविणे गरजेचे आहे. परमपूज्य सदगुरु अण्णा महाराज हे समाजाच्या सेवेसाठी गेली ७० वर्षापासून अहोरात्र चंदनासारखे झिजले अन् कापूरासारखे जळाले त्यातून त्यांनी आपणा सर्वांना त्यांच्या आनंदातील आनंद दिला. त्यातून आपण घडलो त्यातून काहीतरी कर्तुत्व दिलं आणि त्या कर्तुत्वातून आपण समाजाचे व त्या परमेश्वराचे काही तरी देणे आहे. असे माणून प्रत्येकाने एकमेकाला समजून घेणं त्याची सेवा करणे गरजेचे आहे. माणसाच्या जन्माचा मूळ हेतू आहे परंतु, समाज हे कुठेतरी विसरत चालला आहे ही एक मला खंत लागून आहे. असे प. पू. टेंबे स्वामी महाराज म्हणाले.