आमदार खताळावर हल्ला करून तुम्ही जनतेच्या मनातून उतरले - विखे पाटील

संगमनेर Live
0
आमदार खताळावर हल्ला करून तुम्ही जनतेच्या मनातून उतरले - विखे पाटील 

◻️ आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्या झाल्याबाबत संगमनेर येथे निषेध सभा

◻️ धांदरफळच्या घटनेने तालुक्याचा आमदार बदलला; आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवा

संगमनेर LIVE | एकीकडे आम्ही संगमनेर तालुका दहशत मुक्त करू अन दुसरीकडे तुम्हीच दहशत करून असे हल्ले घडून आणायचे असा प्रकार येथून पुढे संगमनेर तालुका सहन करणार नाही. तुमच्या धाक दडप शाहीमुळे जनतेने तुम्हाला पराभूत केले आहे. पण आता आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करून तुम्ही जनतेच्या मनातून उतरला आहात. अशी खरमरीत टिका राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ महायुतीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकरांच्या वतीने प्रांत अधिकारी अरुण उंडे यांना निवेदन देण्यात आले. 

निषेध सभेत बोलताना मंत्री विखे म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील मतदार आता जागा झाला आहे  त्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकली आहे अमोल खताळ यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असून असे भ्याड हल्ल्याने ते घाबरणारे नाही. धांदरफळच्या घटनेतून या तालुक्याचा आमदार बदलला मात्र, आता आमदारांवरती हल्ला करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. 

असे आवाहन करून ते म्हणाले की, कालच्या घटनेतून तुम्ही अमोल खताळ यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न केला असला तरी तालुक्यातील जनता त्यांच्याबरोबर आहे. केवळ समाज माध्यमावर खोट्या पोस्ट टाकून तुम्ही या घटनेला जाणीवपूर्वक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न तुम्ही केला असला तरी, कोणत्या ही गोष्टी लपुन राहिल्या नाहीत. घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्येच हल्लेखोराचे समाजमाध्यमाचे सर्व अकाउंट बंद कसे होतात? असा सवाल उपस्थित केला.

मंत्री विखे यानी या सर्व प्रकरणाची पोलीस अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे सखोल करण्याच्या सूचना देऊन म्हणाले की, या तालुक्यात हल्ले करण्याची परंपरा ही जुनीच आहे. धांदरफळ घटना असेल किंवा तालुक्यात घडलेल्या अजूनही काही घटनांमुळे खरी दहशत कोण निर्माण करत आहे हे आता जनतेला समजले आहे. महायुती सरकार मात्र अमोल खताळ यांच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची प्रक्रिया पुढे घेऊन जात आहे. ४० वर्षात तालुक्याला निळवंडे धरणाचे पाणी मिळू शकले नाही ते आज युती सरकारमुळे मिळाले आहे. निवडणुकीतही त्यामुळे या संगमनेर तालुक्याला आम्ही विकासाकडे घेऊन जाणार आहोत. यापुढे असे हल्ले झाल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ. असे परखड मत मंत्री विखे यांनी व्यक्त केले‌.

आमदार अमोल खताळ म्हणाले की, माझ्यावर हल्ला करण्याचा जो प्रकार झाला आहे तो अत्यंत दुर्दवी आहे. काही जण जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून जनतेला आपल्या जवळ घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. लोकशाहीने केलेला पराभव त्यांना मान्य नसून त्यांना तो पचवता येत नाही. त्यामुळे ते असे हल्ले माझ्यावर करण्याचा  प्रयत्न करत आहे. परंतु त्यांनी कितीही हल्ले करू द्या मी एक इंच ही मागे हटणार नाही. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. अशा भ्याड हल्ल्याने मी घाबरणार नाही. मी गणेशोत्सवामुळे थांबलो, म्हणून काही आम्ही बांगड्या भरलेल्या नाही. माझ्या कार्यकर्त्याना हात लावला तर पहिली गाठ माझ्याशी आहे.

नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की, राजकीय द्वेषापोटी आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला आहे. त्या घटनेचा मी निषेध करतो. तालुक्यातील ४० वर्षाचे रखडलेले प्रश्‍न सोडविण्याचे काम आ. खताळ करत आहे आणि त्या प्रश्नाची सोडवणूक विधानसभेत ते पोट तिडकीने करत आहे. ही पोटदुखी काहींना सहन होत नाही. संपूर्ण सरकार आमदार खताळ यांच्या मागे भक्कम उभे असल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.

दरम्यान यावेळी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील संतप्त भावना व्यक्त करत हल्ल्याचा निषेध केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !