प्रसाद गुंजाळ आणि माझ्या आर्थिक व्यवहारात आमदार खताळाचा सबंध नाही
◻️ रवींद्र देशमुख यांनी पत्रकार परिषदेत घेत दिली माहिती
संगमनेर LIVE | प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारात आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. राजकीय हेतुने त्यांची बदनामी करण्यासाठी माझ्या आर्थिक व्यवहारांचा उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबावे लागेल. अशी माहिती रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
रविंद्र देशमुख यांनी म्हटले की, प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडींगचा व्यवसाय करत होते. मागील २० वर्षापासून त्यांची व माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडींगच्या व्यवसायामध्ये आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात देणेदारी झाली. यासाठी त्यांनी ३२ लाख ५० हजार रुपयांची रक्कम इतरांची देणेदारी मिटविण्यासाठी मी देवू केली. सदर रक्कम एक महिना टप्प्या-टप्प्याने परत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते.
या रकमेचा एक भाग म्हणून दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी ५ लाख रुपये रोख स्वरुपात परत दिली व उर्वरीत रक्क्म प्रसाद गुंजाळ वेळेत देवू शकले नसल्याने त्यांनी दि. ३० एप्रिल २०२४ रोजी संगमनेर येथील ऍक्सीस बँक शाखेचा रु. १३ लाख रकमेचा धनादेश क्र. २०५४३९ दिला आणि दुसरा धनादेश क्र. २०५४४० नुसार १४ लाख ५० हजार हा दि. २० मे २०२४ रोजी दिला.
मात्र हे धनादेश बँकेच्या खात्यात भरुनही न वटल्याने मी त्यांना ॲड. एस. एम. जोंधळे यांच्या माध्मयातून दि. ६ जून २०२४ रोजी नोटीस पाठवली. विशेष म्हणजे यासर्व आर्थिक व्यवहारांचा करारनामा दि.१८ मार्च २०२४ रोजी नोटरी पब्लिक ॲड. डी. एस. वर्पे यांच्या समोरच करण्यात आला होता. झालेल्या फसवणूकीवरुन याबाबतची कायदेशीर प्रक्रीया आता सुरु असल्याचे रविंद्र देशमुख यांनी सांगितले.
प्रसाद गुंजाळ यांच्या मातोश्री अनिता गुंजाळ यांनी राजकीय दबावा खाली येवून प्रसिद्ध केलेल्या बातमीतही लोकांची देणेदारी मान्य केली आहे. याचा अर्थ त्यांच्या मुलाचे आर्थिक व्यवहार त्यांना मान्य आहे. वस्तुस्थिती लक्षात घेता माझ्यातील आणि प्रसाद गुंजाळ यांच्यातील झालेले आर्थिक व्यवहार ते मान्य करीत आहेत. मात्र या रकमेसाठी प्रसाद गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.
मात्र, माझे पैसे देण्याऐवजी त्यांनी यासर्व आर्थिक व्यवहारांना राजकारणाशी जोडून माझी व्यक्तीगत बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविक या सर्व व्यवहारात आमदार अमोल खताळ यांचा कुठेही संबंध आलेला नाही. तरीही जाणिवपूर्वक त्यांची बदनामी करण्याचे काम प्रसाद गुंजाळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी काही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली येवून सुरु केले आहे.
सदर बाब अतिशय गंभीर असून, आमचे पैसे आम्हाला मिळावेत यासाठी कायदेशीर प्रक्रीया सुरु असताना, जाणीवपूर्वक ही आर्थिक देवाण-घेवाण टाळण्यासाठी प्रसाद गुंजाळ याने आता या आर्थिक व्यवहारांना राजकीय वळण देवून स्वता: वाचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र आमची कायदेशीर प्रकीया ही सुरुच राहाणार असल्याचे रविंद्र देशमुख यांनी शेवटी सांगितले.
प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी माझे व्यक्तीगत संबंध आले. त्यांच्या शेअर मार्केटच्या व्यवसायामध्ये माझी कुठलीही गुंतवणूक नाही. मात्र आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी माझ्याकडे एक महिना मुदतीकरीता ५० लाख रुपयांची मागणी केली. वचनपत्र तयार करुन ही रक्कम मी त्यांना दिली. मात्र एक महिना झाल्यानंतरही रक्कम परत न आल्यामुळे त्यांनी मला दिलेला धनादेश १६ ऑगस्ट २०२३ रोजी बँकेत जमा केला होता. मात्र स्टॉप पेमेंट या कारणाने हा धनादेश परत आला. मी दिलेली रक्कम मागणी करुनही न मिळाल्याने सध्या या प्रकारणाची न्यायालयीन प्रक्रीया सुरु आहे. अशी माहिती स्वामीप्रसाद डाके यांनी दिली.
समाज माध्यमात प्रसारीत झालेल्या वृतांमध्ये प्रसाद गुंजाळ यांना लोकांची देणेदारी असल्याचे मान्य केले आहे. वस्तुस्थितीप्रमाणे हे व्यवहार रविंद्र देशमुख आणि स्वामीप्रसाद डाके यांना दिलेले पैसे परत केले नाहीत म्हणून केसेसही केलेल्या आहेत. असे तक्रारदाराचे वकील संग्राम जोंधळे यांनी सांगितले.