शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली आकडेवारी फसवी - बाळासाहेब थोरात
◻️ राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची केली मागणी
संगमनेर LIVE | राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाले आहेत अशा अडचणीच्या काळामध्ये सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिला पाहिजे. प्रत्येक एकरला मदत झाली पाहिजे. सरकारने निवडणूक काळामध्ये दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळत आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करताना सध्या जाहीर केलेली आकडेवारी ही फसवी असल्याची टीका कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
नाशिक रोड येथे उत्तर महाराष्ट्रातील कॉग्रेस कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीष कोतवालआदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्या लोकशाही व राज्यघटनेसाठी अत्यंत अडचणीचा काळ आहे. लोकशाहीसाठी देशाचे नेते राहुल गांधी लढत आहेत. त्यांना अशा अडचणीच्या काळामध्ये आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. कॉग्रेसचा विचार हा लोकशाही आणि राज्यघटनेचा शाश्वत विचार आहे. तो वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानी कटिबद्ध राहिले पाहिजे.
याचबरोबर सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असून हा हल्ला भारताच्या राज्यघटनेवर आणि मूलभूत तत्वांवर आहे. सध्या देशात दहशतवाद सुरू झाला आहे. पुन्हा एकदा स्वातंत्र्य व लोकशाहीसाठी मोठी लढाई आपल्या सर्वाना करावी लागणार आहे.
मागील आठवड्यामध्ये ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या भागातील शेतकरी संपूर्ण उध्वस्त झाले आहेत. नागरिक हवालदिल झाले आहे. शेतकऱ्यांवर अवलंबून असणारे अनेक घटक आहेत. अशा काळात सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे पूर्णपणे पाठीशी उभे राहिले पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळामध्ये विना अट शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली होती.
सध्याच्या राज्य सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी आश्वासन दिले होते. आता शेतकऱ्यांना खरी गरज आहे खरे तर, पहिले सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी मदत जाहीर केली पाहिजे. ज्याच्यामधून शेतकरी उभा राहील. मात्र असे झालेले नाही फसवे आकडेवारी दिली जात आहेत. त्यामधून काहीही होणार नाही. शेतकरी मेटाकुटीला आले असताना सरकार मात्र मग्रुरीने वागत असल्याची टीका त्यांनी केली.