नैसर्गिक संकट असले तरी, या मंगलमय पर्वात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
◻️ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दिपावलीच्या शुभेच्छा!
संगमनेर LIVE (लोणी) | यंदाच्या दिपावली सणावर नैसर्गिक संकटाच सावट असले तरी, या मंगलमय पर्वात नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहीले आहे. महायुती सरकार प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकऱ्याना मदतीचे पॅकेज जाहीर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे समाधान व्यक्त करून जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वाना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनी विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आण्णासाहेब भोसले, डॉ. भास्करराव खर्डे, कैलास तांबे, शिवाजीराव जोंधळे, पोपटराव वाणी, किशोर नावंदर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्यासह सर्व संचालक प्राचार्य उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या मुख्य कार्यालयात चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील आणि सौ. धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. ना. राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालीनीताई विखे पाटील, कारखान्याचे व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्या कुटूबियांनी दिवाळीच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.
मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकटाचे सावट असले तरी, शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे राहीले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्याला नैसर्गिक संकटात मदत करण्याचा निर्णय घेतला त्याचे आपण स्वागत करतो. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोणी येथील भेटी प्रसंगी राज्याला मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेवून ३ हजार २०० कोटी रुपयांच्या पॅकेजची केवळ घोषणा केली नाही तर, त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्य सरकारने अन्य पायाभूत सुविधा करीताही ३२ हजार कोटी रुपयांची मदत देण्याचे नियोजनही केले असल्याचे त्यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या निर्णयाचा लाभ झाला असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनाने अधिका-यांनी सतर्कपणे केलेल्या कार्यवाही बद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या सहकार्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे वर्ग होवू शकले.
ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. परंतू या परीस्थितीवर मात करून आमचा शेतकरी बांधव पुन्हा नव्या उमेदीने उभा राहील आशी अपेक्षा व्यक्त करून, दिपावलीचे मंगल पर्व नवा आशेचा किरण घेवून येणारे असते. संकटावर मात करून नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी हा दिपोत्सव निश्चित सर्वाना बळ देईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी वस्तु सेवाकर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय करून देशातील जनतेला दिलासा दिला. या निर्णयाचा सकारात्मक परीणाम दिवाळी सणात अर्थव्यवस्थेवर झाला. सण उत्सवाच्या निमित्ताने स्थानिक विक्रेत्यांकडून वस्तु खरेदी करण्याच्या त्यांच्या आवाहनाला समाज घटकांनी दिलेला प्रतिसादही बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.