उंबरी बाळापूरचा समाधान उंबरकर ‘सिंबायोसिस विद्यापिठात’ अव्वल!
◻️ वैद्यकीय क्षेत्रातील ‘बॅचलर इन रेडिओथेरपी' मध्ये मिळवले सुयश
संगमनेर LIVE (आश्वी) | जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील रहिवासी आणि संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्ष नेते सरुनाथ उंबरकर यांचे चिरंजीव समाधान उंबरकर याने पुणे येथील नामांकित सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ‘बॅचलर इन रेडिओथेरपी’ पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयश संपादित केले आहे.
पुणे येथे पार पडलेल्या पदवी प्रदान समारंभात विद्यापीठाचे संचालक डॉ. राजीव येरवडेकर आणि डॉ. समिता जाधव यांच्या हस्ते समाधानला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील कठीण मानल्या जाणाऱ्या या विषयात त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. तसेच यावेळी समाधानला ‘बेस्ट ऑफ काॅलेज स्टुडंट अवार्ड’ देऊन देखील गौरविण्यात आले आहे.
समाधानचा शैक्षणिक प्रवास हा प्रेरणादायी असून त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण आश्वी येथील रयत शिक्षण संस्थेत पूर्ण झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने मांचीहिल शैक्षणिक संकुलातून पूर्ण केले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षणाचा पाया भक्कम केल्यानंतर त्याने उच्च शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली आणि आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली.
दरम्यान पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ, सौ. शालिनीताई विखे पाटील, अॅड. शाळीग्राम होडगर यांच्यासह आश्वी पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने समाधानचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
“सातत्यपूर्ण अभ्यास, विषयाची गोडी आणि माझ्या कुटुंबाने माझ्यावर दाखवलेला विश्वास तसेच विभागप्रमुख डॉ. जतिन भाटीया, डॉ. नमिता रायतेकर, कुलदीप जाधव तसेच मयुरा मैत्री, काजल दगडे, वैष्णवी देशमुख, सुशांत म्हात्रे, श्रेयस तुळपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मी मिळवू शकलो आहे." असे समाधान उंबरकर यांने म्हटले आहे.