भंडारदरा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन तातडीने सोडा - मंत्री विखे पाटील
◻️ जलसंपदा मंत्र्याचा संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यांना दिलासा
संगमनेर LIVE (लोणी) | राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने पावले उचलली आहेत. जनतेची तहान भागवण्यासाठी भंडारदरा धरणातून बिगरसिंचनाचे (पिण्याचे) आवर्तन तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वाढत्या तापमानामुळे संगमनेर, राहाता आणि श्रीरामपूर तालुक्यातील विहिरी आणि कूपनलिकांचे स्रोत आटले असून, नदीकाठच्या गावांमध्येही पाणीपातळी खालावल्याने ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांना पाणीपुरवठा करणे कठीण झाले होते. नागरिकांची ही वाढती मागणी आणि पिण्याच्या पाण्याची निकड ओळखून नामदार विखे पाटील यांनी प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली करत हे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.
धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्याचे चोख नियोजन करून हे पाणी लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यत पोहोचेल, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. तसेच, हे पाणी अत्यंत मौल्यवान असल्याने आवर्तना दरम्यान कोठेही पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची विशेष दक्षता स्थानिक प्रशासन आणि संबंधित ग्रामपंचायतींनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींसह शहरी भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला असून उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.