थोरातांनी राहुरी पेक्षा संगमनेरची निवडणूक गांभिर्याने घ्यावी - मंत्री विखे पाटील
◻️ अक्षय कर्डीलेचां उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल होणार; कार्यकर्त्याना कामाला लागण्याचे आदेश
संगमनेर LIVE (राहुरी) | राहुरी विधानसभा मतदारसंघाची आगामी पोटनिवडणूक ही केवळ एक निवडणूक नसून ती स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा देणारी आणि त्यांच्या विकासाच्या स्वप्नांना पूर्ण करणारी आहे. जनतेचा महायुतीला पूर्ण पाठिंबा आहे, आता प्रत्येक कार्यकर्त्याने ‘मीच उमेदवार आहे’ या भावनेतून घराघरापर्यत पोहोचण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
येत्या सोमवारी, ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे. विशेष म्हणजे साकळाई योजनेच्या कामासाठी राज्य सरकारने १ हजार २३४ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी मंत्री विखे पाटील यांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
वांबोरी चारी आणि साकळाई योजनेच्या माध्यमातून या भागाचा वर्षानुवर्षांचा दुष्काळ कायमचा पुसून टाकण्याचे स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे स्वप्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार पूर्ण करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना मंत्री विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विखे पाटील म्हणाले की, “गावागावातील छोटे-मोठे हेवेदावे आणि मतभेद बाजूला ठेवून केवळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला मतदारांना सामोरे जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळे देश जागतिक स्तरावर प्रगती करत आहे, मात्र इंधन आणि गॅस टंचाईच्या अफवा पसरवून सरकारला बदनाम करण्याचे जे प्रयत्न होत आहेत, त्यांना कार्यकर्त्यानी सडेतोड उत्तर दिले पाहिजे. तसेच सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय आणि योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही कार्यकर्त्याची मुख्य जबाबदारी आहे.” असे सांगितले.
यावेळी आमदार मोनिका राजळे यांनीही आपले विचार मांडले. या बैठकीस ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उमेदवार अक्षय कर्डिले, सुरसिंग पवार, नामदेव ढोकणे, रिपाइंचे सुरेंद्र थोरात आणि काशिनाथ लवांडे यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काॅग्रेसच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. महायुतीचा विजय निश्चित असल्याचे सांगताना त्यांनी बाळासाहेब थोरातांनी राहुरी पेक्षा संगमनेरची निवडणूक गांभिर्याने घ्यायला हवी होती. अशी बोचरी टीका केली. तसेच अशोक खरातबाबात थोरांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर या प्रकरणाची पाळेमुळे नेमकी कुठे आहेत, हे सर्वासमोर येईलच, असे सुचक वक्तव्य देखील केले.